नाशिक : भाजप-शिवसेना युती असताना, उद्धव व राज ठाकरे वेगळे झाल्यावर प्रमोद महाजनांना उद्धव यांच्याऐवजी राज ठाकरे यांच्याशी युती करण्याची इच्छा होती, असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केला.
खांडेकर यांनी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्यापासून ते प्रमोद महाजन, सुशीलकुमार शिंदे, प्रवीण महाजन, शशी रुईया, अशोक खाडे, मंगेशकर कुटुंबीय, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, आमिर खान, सत्यजित भटकळ यांच्यासारख्या दिग्गजांच्या आठवणी, प्रसंग, किस्से कथन करीत कधी श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले, तर कधी अंतर्मुख केले. खांडेकर म्हणाले की, भाजपमध्ये त्या काळात वाजपेयी, अडवाणींसारखे दिग्गज नेते असले, तरी महाजनांचा दबदबा होता. त्यांच्या शब्दाला मान होता. उद्धव व राज वेगळे झाल्यावर मनसेने दहा-बारा टक्के मते घेतली तर आपण उद्धवऐवजी राज ठाकरेंना सोबत घेऊ, असे महाजन म्हणाले होते. त्यांना राज यांचे लोकांमध्ये थेट मिसळणे, अभ्यास, वक्तृत्व भावत असे.
याशिवाय, नरसिंहराव यांचे खासगी सचिव राम खांडेकर इतके साधे होते की, ते रोज सायकलने कार्यालयात येत व स्वतःला लागणारी कॉफीसुद्धा थर्मासमध्ये घेऊन येत. उद्योजक अशोक खाडे यांनी घेतलेली महागडी साडी आईने घरात बेलाची पाने आणून देणाऱ्या गुरविणीला देऊन टाकली. त्या प्रसंगातून प्रत्येक गोष्ट पैशांत मोजून चालत नाही, असा धडा खाडे यांना मिळाला. शास्त्रीय गायिका मालिनीबाई राजूरकर यांनी जादा दिलेल्या मानधनातील निम्मे पैसे शरद पवारांना परत केले होते. गायक सुखविंदर सिंग यांनी झोपताना ‘चांदोबा’तील गोष्टी सांगण्यासाठी खास माणूस ठेवला आहे, असेही राजीव खांडेकर यांनी सांगितले. पत्रकारितेमुळे निरनिराळ्या क्षेत्रांतील माणसांना अनुभवता आले. त्यांच्या अनुभवांतून शिकता आले व आयुष्य समृद्ध होत गेले. आयुष्यात काय करू नये, याचे धडेही काही माणसांकडून मिळाले, असेही खांडेकर म्हणाले.
दवप्रभा प्रॉडक्शनच्या वतीने आयोजित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका भावना भार्गव स्मृती व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प गुंफताना खांडेकर ‘माणसं उमगलेली… उमजलेली’ या विषयावर बोलत होते. नाशिक येथील शंकराचार्य संकुल येथे रविवारी (दि. १ जून) हे व्याख्यान झाले. प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी खांडेकर यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारी ध्वनिचित्रफीत सादर करण्यात आली. प्रमोद भार्गवे यांनी सत्कार केला.