सलीम शेख
माणगाव : भरधाव खाजगी बसची ऑटो रिक्षाला जोरदार धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, तर या अपघातात ३ जण जखमी होऊन रिक्षाचा चक्काचूर झाला. सदरील अपघात सोमवार, दि. २ जून २०२५ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास गुरुकृपा हॉटेलसमोर जुने माणगाव येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडला. या अपघाताची फिर्याद अश्विनी स्वप्नील दळवी (वय ३०, चक्कीनाका, कल्याण पूर्व) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी जखमी महिला अश्विनी दळवी या जखमी साईशा स्वप्नील दळवी (वय ४, रा. चक्कीनाका,कल्याण पूर्व) यांचेसह मावशीच्या घरी जेवण करून मावस भाऊ अनिल अशोक सोनार यांचे घरी जाण्याकरिता मामा अशोक भिकू सोनार यांच्या रिक्षा क्र. एमएच.०६ बीव्ही.२१९३ या गाडीमध्ये बसून जात असताना मामा अशोक सोनार हे रिक्षा मागे घेऊन मुंबई-गोवा महामार्गाच्या जवळ येऊन थांबून महामार्गावरील गाड्या पाहत असताना मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे जाणारी बस क्र. एमएच ११ सीएच ७६११ या गाडीवरील चालकाने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या डाव्या बाजूस खाली जाऊन उभ्या असलेल्या रिक्षाला धडक मारून अपघात केला. या अपघातात रिक्षा चालक अशोक भिकू सोनार (वय ६५, रा. जुने माणगाव, सुतारवाडी) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांना अधिक उपचाराकरिता मुंबईकडे घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अशोक सोनार यांच्या आकस्मित निधनाने सोनार कुटुंबियांबरोबरच जुने माणगावकर व मित्रपरिवार यांच्यावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात परी अनिल सोनार (वय ११, रा. जुने माणगाव), अश्विनी स्वप्नील दळवी (३०) व साईशा स्वप्नील दळवी (वय ४, दोघी रा. चक्कीनाका, कल्याण पूर्व) हे ३ जण जखमी झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं.११९ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात येऊन बसचा चालक आरोपी कालिदास बाबुराव कोकरे (रा. कुंभारमाठ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार हे करीत आहेत.