अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्याच्या प्रवेशद्वारात असणाऱ्या आराठी गावातील कचऱ्याची समस्या सुटता सुटत नाही. मात्र, आता कचऱ्यासह दुर्गंधी पसरवणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आराठी ग्रामपंचायतीची हद्द श्रीवर्धन शहराला लागून आहे. येथे कचऱ्याचा राडारोडा वाढत असताना, सांडपाणी मुख्य रस्त्यावर आल्याने स्वच्छतेचा पुरता फज्जा उडाला आहे. नव्याने होत असलेल्या इमारतींचे जाळे, त्यात लोकवस्ती आणि वाढती दुकाने यांना कचरा विल्हेवाटीसाठी मार्ग उपलब्ध नसल्याने, या इमारतींचे दुर्गंधीचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकार्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
श्रीवर्धनहून बोर्लीपंचतन, हरिहरेश्वर जाणाऱ्या मुख्य मार्गातील चौकातच दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जाते. त्यामुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. गावाचा विस्तार मोठा आहे. मात्र, ग्रामपंचायतीतर्फे विविध ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था न केल्याने नागरिकांकडून इमारतीतील टॉयलेट, बाथरूमचे पाणी रस्त्यावर सोडले जाते.
कोहिनूर व एकता इमारतीमधील सांडपाणी रस्त्यावर सोडलं जातं, यावर ग्रामपंचायतकडून देखील ठोस उपाय योजना होत नसल्याने येथील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-सतीश भिसे,
रहिवासी.
दोन दिवसात येथील सांडपाणी समस्येवर उपाययोजना करण्यात येईल.
-माधव जाधव,
गटविकास अधिकारी.