महाराजांना साधा हारही न घालणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाची लाजिरवाणी बेपरवाई
घन:श्याम कडू
उरण : दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक मोठ्या थाटात, लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा होत असताना, उरण नगरपरिषद प्रशासनाने मात्र महाराजांच्या पुतळ्याला साधा हारही घालण्याची तसदी घेतली नाही. ही गोष्ट उरणवासीयांना चटका लावणारी ठरली आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी उरण नगरपरिषदेच्या बेशिस्त आणि बेदरकार कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विमला तलावाजवळ उभारलेला शिवरायांचा सिहासनाधिष्टित पुतळा हा उरणकरांचा अभिमान असतानाही, त्या पुतळ्याकडे प्रशासनाने पाठ फिरवली, हे अत्यंत खेदजनक आहे.
शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पुतळ्याला अभिवादन करायला गेलेल्या भोईर यांना त्या ठिकाणी गेट बंद अवस्थेत आढळले. मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी “आम्हाला कुठलाही आदेश नव्हता, रायगडावर कार्यक्रम आहे” असं सांगितल्याने प्रशासनाच्या असंवेदनशीलतेची पोलखोल झाली.
“जिल्हाभर महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा जल्लोष सुरु असताना उरणमध्ये नगरपरिषदेने शिवरायांना हार घालावा असंही वाटलं नाही, ही गोष्ट प्रत्येक शिवभक्ताच्या जिव्हारी लागणारी आहे. ही लाजिरवाणी आणि शिवरायांचा अपमान करणारी गोष्ट आहे,” असं रोखठोक मत भोईर यांनी व्यक्त केलं. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्यासोबत उरण उपतालुका संघटक अमित भगत, विभागप्रमुख एस. के. पुरो, उपविभागप्रमुख रवी पाटील, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, माजी सरपंच जगजीवन नाईक उपस्थित होते.