• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिंचोटी ग्रामस्थ पिताहेत किडे पडलेले दुर्गंधीयुक्त पाणी; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

ByEditor

Jun 11, 2025

प्रशासक, ग्रामसेवकाबरोबरच पाणी सोडणाऱ्याविरोधात प्रमोद पाटील यांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार

अमुलकुमार जैन
रायगड :
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बांधलेल्या विहीरीमधील कुजलेल्या, किडे पडलेल्या कुत्र्याचे दुर्गंधीयुक्त पाणी चिंचोटी ग्रामस्थांना दुषित पाणी प्यायची वेळ आली आहे.

सदरचे दूषित घाणेरडे पाणी पाजणाऱ्या निलेश मनोहर ठाकूर, मनोहर सिताराम ठाकूर तसेच ग्रामपंचायत चिंचोटीचे प्रशासक, ग्रामसेवक यांच्याविरूध्द मानवी जीवितास धोका पोहचवणे तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणे याबाबतीत भारतीय न्याय दंडसंहिता २०२३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करणेबाबत चिंचोटी गावचे प्रमोद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी रायगड, पोलिस निरीक्षक रेवदंडा पोलिस ठाणे, तहसीलदार अलिबाग यांच्या कार्यालयात लेखी तक्रार करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

सदरच्या तक्रार अर्जामध्ये तक्रार करत म्हटले आहे की, आमच्या गावामध्ये नागरिकांच्या पिण्याचे पाणी ज्या विहीरीतून सोडले जाते त्या विहीरीमध्ये कुत्रा पडून मरून तो कुजून त्यावर किडे पडलेले घाणेरडे पाणी आम्हा नागरिकांना पाणी सोडणारा कामगार निलेश मनोहर ठाकूर व मनोहर सिताराम ठाकूर हे आम्हा चिंचोटी ग्रामस्थांना दुषित पाणी मागील कित्येक दिवसांपासून जाणीवपुर्वक सोडत आहेत. चिंचोटी गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी सोडण्याचे काम निलेश मनोहर ठाकूर व मनोहर सिताराम ठाकूर हे करीत आहेत. पिण्याचे पाण्याला घाणेरडा वास येतोय म्हणून गावामध्ये चर्चा सुरू झाली. गावातील लोकांनी सदरची बाब पाणी सोडणाऱ्या मनोहर ठाकूर यांच्या निदर्शनासही आणून दिली तरीही या मेलेल्या कुत्र्याकडे मनोहर ठाकूर यांनी लक्ष दिले नाही. ग्रामपंचायत चिंचोटीच्या ग्रामसेवकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही. विहीरीमध्ये कुत्रा पडून तो कुजून त्यावर किडे पडलेले घाणरेडे पाणी नागरीकांना प्यावे लागत आहे हे आमचे दुर्दैव आहे.

गावातील नागरिकांना पाणी देण्याबाबत ग्रामपंचायत चिंचोटीने हात वर केल्यानंतर गावातील महिलांनी प्रत्येकी १०००/- वर्गणी काढून पाणी योजना सुरू करून निलेश ठाकूर व मनोहर ठाकूर यांना एकूण रक्कम रूपये १०,०००/- (दहा हजार रूपये) दर महिना पगार दिला जातो. पगार घेवूनही हे दोघे विहीरीमध्ये मेलेल्या कुजलेल्या कुत्र्याचे पाणी नागरीकांना आजही पाजत आहेत. सदरच्या घटनास्थळाचा आपण प्रत्यक्ष जागेवर येवून पंचनामा करून वस्तुस्थिती पहावी. आम्हा चिंचोटी ग्रामस्थांना अत्यंत नीचपणाचा कळस गाठून जे पाणी पाजले जात आहे त्याचे माणूस म्हणून सदरच्या अर्जावर आपण कारवाई करावी.

चिंचोटी गावातील जलजीवन मिशन योजनेमध्ये बांधलेल्या नागरिक पित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरीमध्ये कुजलेल्या, किडे पडलेल्या कुत्र्याचे आम्हा चिंचोटी ग्रामस्थांना दुषित पाणी पाजणाऱ्या निलेश मनोहर ठाकूर, मनोहर सिताराम ठाकूर तसेच ग्रामपंचायत चिंचोटीचे प्रशासक, ग्रामसेवक यांच्याविरूध्द मानवी जीवितास धोका पोहचवणे तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणे याबाबतीत भारतीय न्यायदंडसंहिता २०२३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जलजीवन मिशन योजनेतून बांधलेल्या विहिरीतून सध्या चिंचोटी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा केला जातो, सदरच्या विहिरीमध्ये कुत्रा मरून त्यावर किडे पडून दुर्गंधीयुक्त पाणी प्यावं लागते, मानवी जीविताला हानी पोहचवण्याचा हा एक प्रकारे गुन्हा आहे, त्यामुळे प्रशासनाने संबंधीतावर तत्काळ गुन्हा दाखल करावा.
-प्रमोद पाटील, 
तक्रारदार

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!