मुंबई : २०२२ ला शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं ते शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत तर शिवसेना घेऊनच बाजूला झाले आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. महाविकास आघाडीत काँग्रेसची साथ घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याची बाब एकनाथ शिंदेंना खटकली होती. अडीच वर्षांनी शिवसेना बरोबर घेऊन एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यांना साथ लाभली ती ४० आमदारांची. शिवसेनेतलं हे सर्वात मोठं बंड ठरलं. आता भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरे होत्या असा दावा केला आहे.
आम्ही शिवसेनमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे. आमदार कार्यकर्त्यासह त्यांना भेटायला जात तेव्हा त्यांना बसवून ठेवले जायचे. त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत. त्यामुळे आमदाराचे काम होत नसेल तर कार्यकर्त्याचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता. पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेबाप्रमाणे उद्धव ठाकरे नव्हते असे ते म्हणाले.
बाळासाहेबांच्या कामाची पध्दत आम्हाला उध्दवसाहेबांमध्ये दिसली नाही. माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो तेंव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही. तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढून घेणाराही मी आहे. बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा. आम्ही मातोश्रीवरून परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार आमदारांना एंट्री नाही. आता ज्या एंट्री आहेत ती रहायला पाहिजे. संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर माराल तर अशीच स्थिती होणार, असे अनुभव सांगत गोगावले यांनी मन मोकळे केले.
आम्ही आत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आणि कायम त्यांच्या सोबत आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत. त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षच चिन्ह आम्हाला मिळाला आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स पण गमावला, असा टोला गोगावले यांनी लगावला.