महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाची अद्यापही पूर्व तयारी नाही
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्याला जोडण्यात आलेल्या दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले. मात्र, दरवर्षी या मार्गावरील दिघी – वेळास दरम्यानच्या घाटातील रस्त्यालगत असणारे डोंगर पावसाळी धोक्याचे इशारा देत आहेत. अशा धोकादायक प्रवासाचा संताप व्यक्त करत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
बुधवारी रात्री तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे येथील डोंगर भागातून मोठमोठ्या दगडी मातीच्या ढिगार्यासकट खाली रस्त्यावर आल्या. परंतु रात्रीची वेळ होती म्हणून वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे दुर्घटना घडली नाही. पूर, दरडी कोसळणे यासारख्या आपत्ती, जास्त करुन घाट रस्त्याला होत असल्याने अनेक अपघाती घटना दरवर्षी समोर येत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मागील वर्षाला देखील अतिवृष्टीमुळे दिघी-वेळास घाटात ठिकठिकाणी छोट्या मोठ्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रसंगी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने या मार्गावरील वाहने इतर रस्त्यांनी फिरवण्यात आली. कारण रस्त्याच्या कामासाठी येथील डोंगर पोखरण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी सुध्दा दरडीपासून धोका उद्भवू शकतो. अशी शक्यता प्रवाशांकडून वर्तवली जात आहे.
दिघी-वेळास मार्गावर दिघी पोर्टकडे जाणाऱ्या लहान – मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. त्यात पर्यटन म्हणून मुरुड व श्रीवर्धन तालुका याच मार्गाने जोडल्याने रस्त्याला बारमाही पर्यटकांच्या वाहनांची ये – जा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र, या मार्गातील कुडगाव गावाच्या पुढे घाट रस्त्याला पाण्याची टाकी समोरील डोंगरावरील लहानसहान दगड रस्त्यावर येत असल्याची माहिती प्रवाशांकडून मिळत आहे. त्यामुळे यंदा या मार्गाला पावसाळी दरडीचा संभाव्य धोका पाहता महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाचे या कडे कोणतीच पूर्व तयारी वा खबरदारी घेत नसल्याचे समोर येत आहे. याकडे संबधित खात्यांनी आपापली जबाबदारी ओळखून तिथे कोणताही अपघात होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यावी व या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक प्रवाशी करत आहेत.
दिघी – वेळास घाटात संभाव्य दरड कोसळण्याचा धोका पाहता संबंधित विभागाने योग्य ती काळजी घेऊन पावसाळी होण्याऱ्या दुर्घटना टाळाव्यात. जोरदार पावसात डोंगरातील दगडी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे सध्या येथील वाहन चालकांचा प्रवास भीतीदायक बनला आहे.