अमूलकुमार जैन
रायगड : अलिबाग तालुक्यातील नागोठणेपासून काही अंतरावर असलेल्या बेणसे सिध्दार्थ नगर येथील शेततलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी घडली. या घटनेमुळे नागोठणे परिसरात खळबळ उडाली असून, तिघांवर वडखळ येथील संजीवनी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुडालेल्यांची नावे जोहेब जाकीर अत्तर (१७), मिझान जाकीर अत्तार (१४) आणि अश्फाक अली (१६) अशी असून, हे तिघे दुपारी शेततलावात (सालडोली) पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पोलीस कर्मचारी आणि गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून तिघांना बाहेर काढले.
प्राथमिक उपचारासाठी तिघांना रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेल्फेअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना वडखळ येथील संजीवनी रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी रुग्णालयात भेट देऊन उपचारांची पाहणी केली. दरम्यान, शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले. नागरिकांनी बुडालेल्या तरुणांना खांद्यावर उचलून मुख्य रस्त्यावर आणले. यावेळी स्थानिक तरुणांनी तत्परतेने मदतकार्य केले. रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.