मुंबई : कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा धोका निर्माण झाल्याने २५ जून २०२५ पर्यंत किनारपट्टीपासून दूर राहण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) दिला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून, मासेमारी करणाऱ्या समुदायांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार किनारपट्टीवर जोरदार वारे आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाची स्थिती
राज्यात मागील २४ तासांत पालघर जिल्ह्यात सर्वाधिक ७३.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये ३६.४ मिमी, रत्नागिरीत २५.८ मिमी, रायगडमध्ये १०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले असून, किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये स्थानिक प्रशासन सतर्क आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.