वारंवार जाणाऱ्या विजेमुळे नागरिक त्रस्त; महावितरणकडे तीव्र नाराजी
प्रतिनिधी
नागोठणे : नागोठणे व परिसरातील नागरिक सध्या विजेच्या अस्थिरतेमुळे अक्षरशः हैराण झाले असून, दिवसातून अनेक वेळा होणारे वीज खंडित होणे हे आता रोजचं चित्र ठरलं आहे. विशेष म्हणजे, पुरवठा खोळंबलेला असतानाही वीजबिलांची वसुली मात्र नेहमीच्या वेगात सुरू असल्यामुळे नागरिकांच्या नाराजीला उधाण आलं आहे.
‘कधी येईल, कधी जाईल’ – नागरिकांचा संयम संपतोय
दररोज काही मिनिटांची कळ सोसणं आता काही तासांत रूपांतरित झालं असून, वीजपुरवठा न मिळाल्याने घरगुती कामं, विद्यार्थ्यांचा अभ्यास, व्यापाऱ्यांचं व्यवहार, आणि आरोग्य सुविधाही धोक्यात येत आहेत. सोशल मीडियावर “लाईट कधी येणार?” हा रोजचा प्रश्न झाला आहे.
महावितरणकडून उत्तरशून्यता; तांत्रिक कारणांची आडमुठी ढाल
स्थानिक महावितरण कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करुनही अद्याप कोणतीही स्पष्ट वेळापत्रक किंवा अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. “ट्रान्स्फॉर्मर बिघाड”, “ओव्हरलोड”, “मर्यादित मनुष्यबळ” अशी कारणे नागरिकांना ऐकवली जात आहेत, पण उपाययोजना मात्र शून्य.
“दररोज ५ ते ६ वेळा तासन्तास वीज जात असताना बिल मात्र अजिबात कमी होत नाही. वेळेवर न भरल्यास दंड मात्र न चुकता आकारला जातो, हे दुहेरी अन्यायकारक धोरण असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. “पुरवठ्याची जबाबदारी पाळा, अन्यथा आम्ही मैदानात उतरणार,” असा ठाम पवित्रा घेतला जात आहे.