• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावर फलक दाखवतात दिशा, पण खड्डे दाखवतात शासनाचा बेजबाबदारपणा

ByEditor

Jun 24, 2025

प्रवाशांचा आक्रोश — ‘काम होईल तेव्हा होईल, पण खड्डे तरी भरा!’

विश्वास निकम
कोलाड :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील दिशादर्शक फलकांच्या ठिकाणी मोठाले खड्डे पडले असून, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून वेळोवेळी दिल्या गेलेल्या डेडलाईन्स अपयशी ठरत असताना, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

१८ वर्षांचा खोळंबा, डेडलाईन्सचा फसवा खेळ

२००६ मध्ये सुरू झालेल्या चौपदरीकरणाच्या कामाला तब्बल १८ वर्षे झाली तरी, अद्याप संपूर्ण महामार्ग पूर्णत्वास गेलेला नाही. उड्डाणपुल, साईड पट्टे, गटारे, वळण रस्ते यांसारखी अनेक कामे अर्धवट अवस्थेत असून नागरिकांना दररोज धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.

दिशादर्शक फलकजवळ घातक खड्डे

माणगाव, इंदापूर, तळवली, कोलाड, गोवे स्टॉप, पुई, खांब, सुकेळी, नागोठणे या ठिकाणच्या दिशादर्शक फलकांजवळील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. “एखाद्या प्रवाशाचा बळी गेला तर जबाबदार कोण?” असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा, आंदोलनांचा इतिहास

२०१८ पासून अनेक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी दिलेल्या डेडलाईन्स फोल ठरल्यात. किती ठेकेदार बदलले आणि किती अपघात झाले याचा हिशोबच नाही. पत्रकार संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करूनही काम पूर्ण होताना दिसत नाही.

कोकणी जनतेचा इशारा

शिवसेनेचे चंद्रकांत लोखंडे म्हणाले, “पावसामुळे महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य झाले आहे. टोल नाका सुरू करण्याआधी रस्त्याचे काम पूर्ण करा, नाहीतर कोकणी माणूस रस्त्यावर उतरल्याशिवाय तुमचे डोळे उघडणार नाहीत.”

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!