विठ्ठल ममताबादे
उरण : शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे खंदे नेते लोकनेते दि.बा. पाटील यांच्या १२व्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी “एक तप उलटलं, तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचणार का?” असा सरकारकडे थेट सवाल केला.
पाच हुतात्म्यांचा त्याग, दिबांचा संघर्ष अजूनही उपेक्षित उरणमधील ऐतिहासिक प्रकल्पग्रस्त आंदोलनाचे ते प्रणेते होते. त्या लढ्यात पाच आंदोलकांनी हौतात्म्य स्वीकारले. दिबांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेती, जमिनी व गोरगरिबांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून इतरांसाठी लढण्याचं उदाहरण देशासमोर मांडलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या संघर्षाला काँग्रेसच्यावतीने भूषण पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवत घरत म्हणाले, “दि. बा. पाटील हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. या नावावरून सरकारने चालढकल करणं म्हणजे कोकणातील जनतेचा अवमान आहे. ही अस्मिता कुणीही डावलू नये.”
महेंद्रशेठ घरत यांनी सकाळी ९ वाजता जासई येथे दिबांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पनवेल येथील संग्राम बंगल्यावर त्यांनी दिबांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अतुल पाटील, मनीषा पाटील व इतर सर्वपक्षीय नेते सहभागी होते.