• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागाव-म्हातवली ओएनजीसी सेवानिवृत्त सामाजिक संस्थेच्यावतीने 10वी-12वी विद्यार्थ्यांचा गौरव व मार्गदर्शन शिबिर

ByEditor

Jun 25, 2025

प्रतिनिधी
उरण :
नागाव-म्हातवली ओएनजीसी सेवानिवृत्त सामाजिक संस्थेच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन माऊली मंगल कार्यालय, म्हातवली येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर घरत यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत भविष्यात अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्याचा संकल्प जाहीर केला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते दोन मान्यवर वक्ते – माजी उपआयुक्त (सेंट्रल एक्साइज) सुहास पाटील आणि सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शिका प्रा. कविता सूर्यवंशी. श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, NDA यांसारख्या स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करत अभ्यासाचे नियोजन, ध्येय ठरवणे आणि पालकांची जबाबदारी या विषयांवर सखोल चर्चा केली.

प्रा. कविता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशासाठी लागणाऱ्या चिकाटी, प्रामाणिक मेहनत व सातत्याविषयी प्रेरक अनुभव सांगितले. त्यांनी माहिती तंत्रज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास व विमान उड्डाण व्यवस्थापनासारख्या नव्या क्षेत्रातील संधींबाबतही सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी SPRK Technologies, खारघर या संस्थेशी संपर्क साधावा, असा सल्ला दिला.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प, पेन सेट व भेटवस्तूंनी गौरव करण्यात आला. या सन्मानाने त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवीण घरत यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने पार पाडले. सचिव ॲड. अरुण थळी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमात गावातील नागरिक, पालक, विविध मान्यवर आणि संस्थेचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. माधव विश्वास, सल्लागार श्री. महेंद्र म्हात्रे व श्री. जे सी नाईक यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच संस्थेचे सदस्य श्री. अरुण पाटील, हितेंद्र म्हात्रे, बंड्या माळी, एच. पी. कडू, एन. ए. गायकवाड, रमेश नाईक, रवींद्र म्हात्रे, गजानन म्हात्रे आणि इतरांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नव्या स्वप्नांची प्रेरणा निर्माण झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील विविध करिअर संधींची माहिती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. संस्थेने अशा कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन करून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्स आणि पर्यावरणविषयक करिअर संधी यांचा समावेश करण्याचा संकल्प केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!