• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

इंदापूर-माणगाव बायपासचे काम तातडीने सुरू होणार – खासदार सुनील तटकरे यांची घोषणा

ByEditor

Jun 30, 2025

राजकीय आंदोलनाला यश; ॲड. राजीव साबळे यांच्या पाठपुराव्याची दखल

सलीम शेख
माणगाव :
येथील नेते ॲड. राजीव साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेत माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम तातडीने सुरू झाले पाहिजे. हा बायपास माणगाव तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवण्यासाठी आणि अपघातात नाहक जाणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी तातडीने होणे अत्यावश्यक आहे. या बायपासच्या कामाची निविदा निघालेली आहे. या कामाचे आदेश देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत लवकरच बैठक घेऊन या बायपासचे काम तातडीने सुरू करण्यात येईल असे आश्वासन माणगाव येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

माणगाव आणि इंदापूर बायपास लवकरात लवकर होणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी लोकभावना लक्षात घेऊन काम सुरू करावे. हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी विशिष्ट उद्देशाने काम करावे. हे सरकार लोकांसाठी काम करणारे आहे. तशी भूमिका अधिकार्यांनी घेऊन हा बायपास विशिष्ठ कालावधीत पूर्ण करण्यासाठी काम करावे. या कामात हयगय आणि दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबी खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

माणगाव आणि कळमजे येथील नवीन पुलांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ती लवकर करून या पुलावरून वाहतूक सुरू करावी. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. नाणोरे, उतेखोल आणि भादाव या नगरपंचायत हद्दीतील गावांना सुलभ रहदारी करण्यासाठी ठिकठिकाणी सर्व्हिस रोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. या मार्गावर स्ट्रीट लाईट सुरू करावी. काळ नदी किनारी गणेश विसर्जन करण्यासाठी नव्याने घाट बांधण्यात यावे. जूने माणगाव ते ढालघर फाटा येथील अर्धवट अवस्थेत असलेल्या गटारांची कामे आणि महामार्गावरील साईट पट्टी पूर्ण करावीत. या सर्व कामांमध्ये हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई करण्यात येणार येईल. माणगावातील लोकांनी आपल्या दिरंगाईमुळे खूप सोसले आहे.आता त्यांची सहनशक्ती आणि सहनशीलता संपली आहे. त्यामुळे ही सर्व कामे जलदगतीने निकाली काढून ती पूर्ण करावी असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

याबरोबरच पायाभूत सुविधा उपलब्ध करून नागरिकांची वेळेवर कामे करावी. पुरवठा विभागातील तक्रारी निवारणासाठी खास मदत कक्ष सुरू करावे. विविध प्रकारचे दाखले वेळेत देण्यात यावेत. वीज कंपनीने वेळेवर सुविधा द्याव्यात. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत त्यांना अखंडपणे वीज पुरवठा करण्यात यावा. पुलांची कामे होईपर्यंत माणगाव अंतर्गत सर्व्हिस रोडची कामे करावी. माणगाव शहरात अपघात होऊ नये म्हणून गती रोधक टाकावेत. पुढील आढावा बैठकीत उल्लेख केलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना वजा आदेश खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

या आढावा बैठकीत सुचविलेल्या सर्व कामांचे प्रस्ताव आणि अंदाज पत्रके एकत्रित तयार करुन मंत्रालयात संबंधित खात्याकडे आठ दिवसांत पाठवून द्यावीत. बायपास मार्गावरील ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या आदेशाची वाट न पाहता बायपास मार्गावरील काम तातडीने सुरू करावे. तसेच मोरबा रोड ते महामार्गाचे काम ताबडतोब सुरू करण्यात यावे. जेणेकरून वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांना बसणार नाही. महामार्गावरील अतिक्रमणे काढून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा. तहसील कार्यालयात सर्व सामान्य नागरिक यांच्यासह अपंग, विधवा, दिव्यांग यांची कामे प्राधान्याने करावी. अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे माणगाव येथील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करुन हाल सोसावे लागत आहेत. या सर्व कामांत कुचराई केल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा खासदार सुनील तटकरे यांनी दिला.

या आढावा बैठकीत माणगाव आणि इंदापूर बायपासचे काम आठ दिवसांत सुरू होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या बायपास बाबत नेते ॲड. राजीव साबळे यांनी आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे दस्तुरखुद्द खासदार सुनील तटकरे यांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेत या बायपासचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

या आढावा बैठकीला खासदार सुनील तटकरे, ॲड. राजीव साबळे, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, स्नेहल जगताप, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्ष हर्षदा सोंडकर, सचिन बोंबले, कपिल गायकवाड, तालुका अध्यक्ष काका नवगणे, दिपक जाधव, संदेश मालोरे शेखर देशमुख, राजू शिर्के, रविंद्र मोरे, नितीन वाढवळ, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरसेवक, विविध खात्यांचे अधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हि आढावा बैठक तालुक्यातील महत्वाच्या प्रश्नांबाबत होती. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पत्रकारांना निमंत्रण दिले गेले नाही. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. या आढावा बैठकीचे माणगाव शहरातील पत्रकारांना निमंत्रण दिले गेले नव्हते. या प्रकारामुळे पत्रकार संतप्त झाले होते. त्यामुळे सर्व पत्रकारांनी या आढावा बैठकीवर बहिष्कार टाकला होता. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, यांची दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. यापुढे पत्रकारांना निमंत्रण दिले नाही तर कारवाई करण्यात येईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!