• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मतदारांशी थेट संवादासाठी शाखाप्रमुखांना चार्ज करा – भास्कर जाधव

ByEditor

Jun 29, 2025

शिवसेना संघटनात्मक बळकटीसाठी उरणमध्ये मार्गदर्शन मेळावा

विठ्ठल ममताबादे
उरण:
शिवसेनेत सर्वांत मोठं पद म्हणजे शिवसैनिकच आहे, असं ठामपणे सांगत माजी मंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी शाखाप्रमुखांच्या भूमिकेची नव्याने जाणीव करून दिली. ग्रामीण भागात शाखाप्रमुख हा मतदार, नागरिक आणि पक्ष यांच्यातला महत्त्वाचा दुवा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

उरण टाउनशिपमधील मल्टीपर्पज हॉल येथे रविवार, २९ जून २०२५ रोजी पार पडलेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्याला रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

शाखाप्रमुखांचा संवाद विस्कळीत – पक्षाला धोका

भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शाखाप्रमुखांनी मतदारांशी थेट संवाद साधून पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवणे अत्यावश्यक आहे.” मात्र सध्या अनेक ठिकाणी शाखाप्रमुखांची कार्यक्षमता कमी झाली असून त्याचा थेट फटका संघटनात्मक ताकदीवर बसतोय, असे त्यांनी नमूद केले.

सरकारच्या योजना आणि कथित फसवणुकीवर सडकून टीका

भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी महिलांसाठी जाहीर केलेल्या २१०० रुपयांच्या अनुदान योजनांपासून ते वीज दरवाढीच्या संभाव्य निर्णयापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले. कृषी कर्जमाफी, मोफत वीज, बेरोजगारी, महामंडळ स्थापनेमागील हेतू—या सर्व गोष्टींवर त्यांनी सरकारवर अविश्वास दाखवला आणि ते धोरण “जाती-धर्मांमध्ये फूट पाडणारे” असल्याचे म्हटले.

‘मी गुवाहाटीला गेलो तर राजकारणातून निवृत्ती’ – ठाम भूमिका

“शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांप्रमाणे मीही गुवाहाटीला गेलो, तर मी राजकारणातून निवृत्त होईन,” असे म्हणत त्यांनी आपल्या निष्ठेवर भर दिला. विरोधकांकडून बदनामी आणि खोट्या पुराव्यांवर आधारित कारवाईचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी उघड केले.

नेतृत्वाचे मार्गदर्शन – शाखांमध्ये ऊर्जा संचारली

शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांनी कार्यकर्त्यांना “मतदार यादी हीच गीता आहे” अशा शब्दांत अभ्यासाचा सल्ला दिला. “शिवसेनेचं कार्य अजरामर आहे. कार्यकर्त्यांनी टाळ्यांपेक्षा कृतीवर भर द्यावा” असा स्पष्ट सल्लाही त्यांनी दिला.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं की, “येत्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी आतापासून तयारीला लागा. पराभव हा माझा नव्हता, पैशाचा होता,” असा थेट उल्लेख त्यांनी केला.

हिंदी सक्तीचा निषेध आणि मराठी अस्मितेचा झंकार

मेळाव्याच्या अखेरीस महाराष्ट्र शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. शासन निर्णयाची होळी करून उपस्थित कार्यकर्त्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेचा ठाम आवाज दिला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!