घनःश्याम कडू
उरण : उरण-अलिबाग मार्गावरील करंजा-रेवस पुलाच्या बांधकामामुळे चाणजे गावातील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतीच्या जमिनी संपवण्यात आल्या, मासेमारीचे पारंपरिक बंदर उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे त्यांचा पारंपरिक रोजगार पूर्णतः हिरावला गेला आहे. या सगळ्यामुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले असून, सरकारी यंत्रणा अद्याप निष्क्रिय असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून सतत पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस नुकसानभरपाई किंवा पुनर्वसन योजना जाहीर करण्यात आलेली नाही. परिणामी, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात आज चाणजे गावच्या शिष्टमंडळाने अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सरपंच अजय म्हात्रे, माजी सभापती सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर आणि कुंदन नाखवा हे सहभागी झाले होते.
या बैठकीत ग्रामस्थांनी शासनाकडे पुलामुळे प्रभावित शेतकरी आणि मच्छीमारांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस आराखडा तयार करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्या नाकारण्यात आल्यास गावकऱ्यांना आंदोलनाच्या मार्गावर जावे लागेल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
