• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अपूर्ण महामार्गामुळे कोकणची भाग्यरेषा अस्पष्ट!

ByEditor

Aug 9, 2023

महामार्गावरील खड्ड्यांमुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर पडणार निरूत्साहाचे पाणी

सलीम शेख
माणगाव :
मुंबई-गोवा महामार्गाचे गेली १३ वर्षापासून कोकण वासियांचे दुखणे कायमच राहिले आहे. या मार्गाची दुरवस्था झाली असून वडखळ ते इंदापूर या टप्यातील अनेक भागात महामार्ग उखडला गेला आहे. त्यामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातील खडी बाहेर निघाली आहे. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होत आहेत. तसेच वाहनेही नादुरुस्त होत असल्याने या रस्त्याचा फटका प्रवासी चालकांना बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गापूर्वी विदर्भातून गेलेला समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होवून या मार्गांनी वाहने धावत आहेत. तसेच सोलापूर, औरंगाबाद, धुळे हा महामार्गहि चार वर्षांपूर्वी सुरु झाला. मात्र कोकणातील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या महामार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे कोकणची भाग्यरेषा अस्पष्टच राहिली आहे. अवघ्या दीड महिन्यावर गणेशोत्सव आला असताना महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर कांही ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत. माणगाव व इंदापूर बायपासही अपूर्ण आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांना या खड्ड्यांशी तोंड द्यावे लागणार असून गणेशभक्तांच्या उत्साहावर निरूत्साहाचे पाणीच पडणार आहे.

गणेशोत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपला असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी दौरा केला. गणेशभक्तांना यंदाचे वर्षी प्रवास सुखकर व्हावा यासाठी मंत्री महोदयांनी सिंगल लेन पूर्ण करण्याची हमी दिली होती. त्यामुळे गणेशभक्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र वडखळ ते इंदापूर दरम्यान महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच माणगाव व इंदापूर येथील बायपासचे काम अपूर्ण असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना या शहरात वाहतूक कोंडीशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कोकणच्या प्रवासाला बायपासचे विघ्न कायमच रहाणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १३ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाची अत्यंत गंभीर अवस्था झाली असून या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे लहान-मोठे अपघात तसेच या अपघातांतून अनेकांचे जाणारे जीव व अनेकांना आलेले कायमचे अपंगत्व पाहता हा महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळाच बनला होता.

महामार्गाची गंभीर अवस्था पाहून गेल्या १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर गेल्या १३ वर्षांपूर्वी पळस्पे ते इंदापूर या जवळपास ९० किलो मीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यानंतर इंदापूरपासून पुढे दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या महामार्गाचे काम गेली १३ वर्ष रखडले असून कोकण वासीय त्याची यातना भोगत आहेत. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे कामही अजून व्यवस्थित पूर्ण झालेले नाही. इंदापूरपासून पुढे असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील माणगावचा बायपासचा प्रश्नहि खितपत पडला आहे. बायपासच्या कामाची रखडपट्टी यामुळे माणगाव शहरात सातत्याने शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी व सणांच्या दिवशी वाहनांच्या १० किमी पर्यंत रांगा लागून वाहतूक कोंडी होत असते. त्यातच गणेशोत्सव जवळ आल्याने या गणेशभक्तांना यांचा फटका बसणार आहे.

गणेशोत्सव जवळ आला असून कोकणवासीय मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी आतुरलेला आहे. कोकणात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई, ठाणे, सुरत मधून गणेशभक्त मुंबई-गोवा महामार्गाने आपल्या मूळ गावी जातात. या खड्ड्यामुळे प्रचंड हाल होणार आहेत. यासाठी शासनाने तत्काळ महामार्गावरील खड्डे बुजवावेत यासाठी आपण विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन या महामार्गाची पाहणी करण्यासाठी लक्ष वेधणार आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे स्थानिंक उद्योग धंद्यांवर परिणाम होत असून कोकणची आर्थिक व्यवस्था संकटात सापडत आहे.

राहुल दसवते,
सामाजिक कार्यकर्ते आडघर

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!