सलीम शेख
माणगाव : दक्षिण रायगडातील लोकांना मुंबईत सकाळी लवकर पोहचण्यासाठी सकाळी ६ वाजता वीर ते पनवेल रेल्वेगाडी कशी सुरु होईल याकडे रायगड लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील तटकरे यांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी माणगाव तालुक्यातील व्यापारी वर्गाकडून व नागरिकांकडून केली जात आहे.
माणगावपासून मुंबई हे १४० किलोमीटर अंतरावर असून मुंबईला पोहचण्यासाठी एसटी बसने किमान साडेचार ते पाच तास लागतात. त्यामुळे माणगावमधून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा अर्धा दिवस गाडीतच जातो. त्यामुळे माघारी फिरताना अनंत अडचणी माणगावसह दक्षिण रायगडातील प्रवाशांना येत असतात. सकाळच्या सुमारास माणगावमधून अनेकवेळा एसटी बसेस मिळत नाहीत. त्यामुळे अनेक तास प्रवाशांची रखडपट्टी होते. त्यामुळे अनेकांची मुंबईतील कामे खोळंबतात. माणगावसह दक्षिण रायगडातुन दररोज अनेक व्यापारी तसेच विविध सरकारी, निम सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नोकरदार वर्ग, विद्यार्थी कोलाड, रोहा, पनवेल, मुंबई येथे जात असतात. यासाठी सकाळी ६ वाजता वीर ते पनवेल अशी रेल्वेगाडी सुरु करण्यात आली तर या सर्व प्रवाशांचे अनेक प्रश्न सुटतील .
या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊन सकाळी लवकर आपल्या कामासाठी तसेच खरेदीसाठी या भागातील लोक पोहचू शकतील. मुंबईत ५ ते ६ तास त्यांना आपले काम करण्यासाठी व खरेदी करण्यासाठी वेळ मिळू शकेल. नंतर माघारी फिरताना या प्रवाशांना मुंबई दादर येथून सायंकाळी ५ :३० वाजता दादर- रत्नागिरी हि पॅसेंजर रेल्वेगाडी मिळू शकेल. त्यामुळे हे सर्व प्रवाशी रात्री ९ वाजेपर्यंत आपले मुंबईतील कामकाज आटपून पुन्हा रात्री आपल्या घरी येऊ शकतील. तरी या बाबतीत रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी विशेष लक्ष घालून वीर ते पनवेल हि रेल्वेगाडी सकाळी ६ वाजता सुरु करण्यात यावी अशी मागणी माणगावकरांतून होत आहे.