वार्ताहर
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळ्यानजीक दत्ता फूड मॉलसमोर आज सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सुमारे १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात तीन वाहने चक्काचूर झाली असून अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भारताच्या सर्वाधिक वर्दळीच्या द्रुतगती मार्गांपैकी असलेल्या या महामार्गावर दररोज दीड ते दोन लाख वाहने धावत असतात. शनिवार-रविवारी ही संख्या आणखी वाढते. त्यामुळे पोलिसांकडून वाहतूक नियोजन करण्यात आले होते, मात्र अपघातामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली.

लोणावळा-खंडाळा घाट उतरल्यानंतर दत्ता फूड मॉलसमोर कंटेनरच्या ब्रेक फेल झाल्यामुळे अचानक मोठ्या वेगात आलेल्या वाहनाने समोर असलेल्या वाहनांना धडक दिली. त्यामुळे साखळी अपघात झाला आणि तब्बल १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. त्यात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच अडकून पडल्यामुळे इतर वाहनांना मार्ग काढता आला नाही. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गांचा वापर करून वाहने वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.