अमुलकुमार जैन
अलिबाग : तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांना त्यांच्या कार्यक्षम आणि प्रभावी नेतृत्वाबद्दल राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोणावळा येथील सरीनिटी रिसॉर्टमध्ये 29 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थापक-अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील होते. या कार्यक्रमात हर्षदा मयेकर यांना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या अभिनव उपक्रमांमुळे आणि ग्रामस्थांच्या कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे गौरवण्यात आले.
कार्यक्रमाला माजी आयएसओ अधिकारी चंद्रकांत दळवी, आयएसओ लिड ऑडिटर किरण भगत, परिषदचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, संपर्क प्रमुख सचिन जगताप, प्रसिद्धी प्रमुख विनायक पाटील, आणि जयंत पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण (माउली) ढाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार नागाव ग्रामपंचायतीतील प्रत्येक ग्रामस्थाला समर्पित असून नागाव ग्रामस्थांचे प्रेम, पांठिबा, आशिर्वाद हेच या यशाचे बळ आहे, शिवाय नेहमीच पाठिंबा देत असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी वर्ग यांचे मिळत असलेले सहकार्य तसेच पती निखिल मयेकर यांनी दिलेला आधार व पाठबळ याबद्दल आभार नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी व्यक्त केले.
