सलीम शेख
माणगाव : आ. महेंद्र दळवी तुम्ही आमचे मित्र आहात, दोन वेळा आमदार झाला आहात, मात्र तुम्ही आपले शब्द जपून वापरले पाहिजेत. इतरांनाही तसेच बोलता येते, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकण विभाग संघटक व महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते ॲड. राजीव साबळे यांनी दिला. मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी माणगाव विधी महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आ. दळवींवर जोरदार टिकास्त्र सोडले.
यावेळी राष्ट्रवादीचे माणगाव शहराध्यक्ष सुनील पवार, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, ॲड. सुशील दसवते, विरेश येरुणकर, उद्धव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी रोहा येथे झालेल्या कार्यक्रमात आ. महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व ॲड. राजीव साबळे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना ॲड. साबळे म्हणाले की, “सर्वप्रथम मी आमचे नेते खा. सुनील तटकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दिलेला शब्द पाळून मला कोकण विभाग संघटक आणि राज्याचे मुख्य प्रवक्तेपद दिले. यापूर्वी शिवसेनेनेही मला प्रवक्तेपद दिले होते, मात्र काम करण्याची संधी तिथे मिळाली नाही. आता संघटनेतील बदलामुळे माणगाव तालुक्यात कामाला गती मिळेल.”
आ. दळवींवर टीका करताना त्यांनी पुढे सांगितले की, “महेंद्र दळवींनी कित्येकदा पक्ष बदलले आहेत, ते त्यांनी आधी आरशात पाहावेत. शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंकडे गेलेले दळवी आता आम्हाला राजकारण शिकवतात. इतकेच नव्हे तर रोहा येथील कार्यक्रमात दळवींनी भरतशेठच्या आईच्या स्मरणार्थ नर्सिंग कॉलेज असल्याचा उल्लेख केला. मात्र भरतशेठची आई आजही जिवंत आहे. जिवंत व्यक्तीला ‘स्मरणार्थ’ म्हणणे ही मोठी चूक आहे. तसेच ज्याठिकाणी ते गेले होते तो कार्यक्रम नर्सिंग कॉलेजचा नव्हता तर मातोश्री गंगुबाई शिंदे सीबीएससी स्कूलच्या उद्घाटनाचा होता. दळवींनी आधी माहिती करून घेऊन बोलणे गरजेचे आहे.”
ॲड. साबळे यांनी पुढे सांगितले की, “नर्सिंग कॉलेजच्या भूमिपूजनावेळी तटकरे साहेब व भरतशेठ दोघे उपस्थित होते. मात्र दळवी कोणतीही बाब भावनेच्या आहारी जाऊन राजकारणासाठी वापरत आहेत. सीएसआर फंडातून मिळालेल्या निधीचा उपयोग शाळेसाठी करण्याचे आश्वासन तटकरे साहेबांनी दिले होते आणि त्याची पूर्तताही केली. याउलट या मंडळाला महेंद्र दळवी अथवा भरतशेठ यांनी एक रुपयाचीही मदत केलेली नाही.”
भविष्यातील निवडणुकांचा उल्लेख करताना ॲड. साबळे म्हणाले की, “माझी ताकद काय आहे हे आगामी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत दिसेल. मी शिवसेनेत असताना माणगाव तालुक्यातील तीन जागा निवडून आणल्या होत्या. आता त्या तीन जागा शिवसेनेने निवडून आणून दाखवाव्यात, अन्यथा मी चारही जागा जिंकून दाखवेन.”
पत्रकार परिषदेत त्यांनी आ. महेंद्र दळवींवर केलेली टीका, त्यांचा इशारा आणि पुढील निवडणुकीतील आत्मविश्वास यामुळे माणगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
