• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा पेच वाढला!

ByEditor

Oct 27, 2025

भाजप २४, शिवसेना २४ आणि राष्ट्रवादीला फक्त ११ जागांचा प्रस्ताव; राष्ट्रवादीचा नकार

माणगाव : सलीम शेख

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपावरून तणाव चिघळला आहे. भारतीय जनता पक्षाने मांडलेल्या प्रस्तावानुसार भाजपला २४, शिवसेना (शिंदे गट) ला २४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ११ जागा देण्याचे सूत्र मांडण्यात आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव ठामपणे नाकारत, “समान २० जागा मिळाल्याशिवाय युती शक्य नाही,” असा स्पष्ट पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे गणित बिघडले असून, रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जागावाटपावरून वाद तीव्र

मांडलेल्या प्रस्तावानुसार प्रत्येक आमदाराला ८ जागांच्या प्रमाणात वाटप करण्याचे गणित मांडले गेले. रायगड जिल्ह्यात भाजपकडे ३ आमदार असल्याने २४ जागा, शिवसेनेकडेही ३ आमदार असल्याने २४ जागा, तर राष्ट्रवादीकडे १ आमदार आणि १ खासदार असल्याने ११ जागांचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र राष्ट्रवादीने हा हिशोब फेटाळत “दक्षिण रायगडमध्ये आमचा प्रभाव प्रबळ असून समान वाटा मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादीचा ठाम पवित्रा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाने सांगितले की, तळे, माणगाव, महाड, पोलादपूर, खोपोली आणि कर्जत या मतदारसंघांत पक्षाचे मजबूत संघटन आहे. “मागील निवडणुकांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी आघाडी घेतली असून, आमचा जनाधार कायम आहे. त्यामुळे समान वाटप न झाल्यास आम्ही स्वबळावर लढू,” असा निर्धार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

शिवसेना-भाजपचा दावा

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादीच्या मागणीस नकार देत, “आमचा ग्राऊंड कनेक्ट आणि संघटन विस्तार अधिक आहे. समान वाटप शक्य नाही,” असा दावा केला आहे. शिवसेनेचे म्हणणे आहे की जिल्ह्यात मध्य व किनारी भागात पक्षाची पकड वाढली आहे, तर भाजपकडे उत्तर रायगडमध्ये मजबूत संघटन आहे.

पालकमंत्री पदावरून अविश्वास

रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीने पालकमंत्र्यांच्या निर्णयांवर वारंवार आक्षेप घेतला असून, शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर थेट वैयक्तिक टीका केली आहे. परिणामी दोन्ही पक्षांतील विश्वास संपुष्टात आला असून, युतीची शक्यता अत्यल्प मानली जात आहे.

एका वरिष्ठ कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “पालकमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये एवढा अविश्वास निर्माण झाला आहे की, निवडणुकीपूर्वी एकत्र येणे जवळपास अशक्य आहे. मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी नव्या समीकरणांची शक्यता नाकारता येत नाही.”

स्वबळावर लढण्याची तयारी

महायुतीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने तिन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने जिल्हास्तरीय रणनीती बैठकींचा धडाका सुरू केला आहे, शिवसेनेने स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांशी थेट संपर्क वाढवण्याचे आदेश दिले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने “स्वबळावर सत्ता आणू!” या घोषवाक्याचा प्रचार सुरू केला आहे.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, सध्या महायुती होण्याची शक्यता अत्यल्प असली, तरी निकालानंतर सत्तेच्या समीकरणांत नव्या घडामोडी घडू शकतात. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे ३, भाजपचे ३, आणि राष्ट्रवादीचे १ आमदार तसेच १ खासदार आहे. जिल्हा परिषदेतील एकूण ५९ जागांपैकी बहुतांश ठिकाणी तिन्ही पक्षांचा प्रभाव विभागलेला आहे.

उत्तर रायगडमध्ये भाजप, दक्षिणेत राष्ट्रवादी, आणि किनारी भागात शिवसेना अशी तिन्ही पक्षांची मांडणी दिसते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा तिढा पुढे “राजकीय शतरंज” ठरू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!