चार दिवसांत पाणीपुरवठा सुरू; रस्त्याची पाहणी आणि सुधारणा आदेश लवकरच
सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील उपोषणानंतर प्रशासनाचा निर्णय
उरण । अनंत नारंगीकर
आपटा ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कोरळवाडी व परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाला पुढील चार दिवसांत पूर्णत्वास नेले जाईल, असे आश्वासन पनवेल पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी दिले आहे. यानंतर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वतः उपविभागीय अधिकारी (एसडीओ) पवन चांडक यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
ही माहिती बुधवारी (दि. २९) सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, अध्यक्ष – ग्रामविकास संवर्धन सामाजिक संस्था, यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी, पनवेल कार्यालयासमोर आयोजित आमरण उपोषण बैठकीत देण्यात आली. कोरळवाडी आणि आसपासच्या वाड्यांतील नागरिक दीर्घकाळापासून पाणीटंचाईचा सामना करत असून, या उपोषणाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

बैठकीदरम्यान कोरळवाडीतील सर्व कुटुंबांना अंत्योदय योजनेअंतर्गत पिवळे रेशनकार्ड वितरित करण्यात आले असून, उर्वरित पात्र कुटुंबांना लवकरच रेशनकार्ड देण्यात येतील, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तसेच कोरळवाडीला जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्नही प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा ठेवण्याचे आणि त्या दिवशीच आवश्यक आदेश देण्याचे आश्वासन दिले.
या सकारात्मक घडामोडींनंतर आदिवासी बांधवांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, नायब तहसीलदार (पुरवठा विभाग), सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोवड, तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते काशिनाथ जाधव, दिलीप मोरे, सुभाष मेहतर, सुभाष फडके, वाजिद शेख, रोहित ढमाल, गणेश थोरवे, लाडीवली ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, ग्रामस्थ बी. एस. कुलकर्णी, गुरुदास वाघे, संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी ॲड. राजेंद्र मढवी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
