किरण लाड
नागोठणे : मागील वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा केला होता. यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन तसेच भारताचा 76वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या निमित्त नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागोठणे ग्रामपंचायत समोरील पटांगणात भारत देशाच्या 76व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण सकाळी ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी एस. एन. गायकवाड यांच्या हस्ते होईल. त्यानंतर माता जोगेश्वरी मंदिर समोरील पटांगणात ध्वजारोहण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राकेश टेमघरे यांच्या हस्ते होईल. तेथेच ज्या वीरांनी भारतमातेसाठी आपले प्राणपणाला लावले असे स्वातंत्र्यसैनिक, जवान, शहीद पोलीस या मातृभूमिच्या वीरांना अभिवादन म्हणून शिलाफलकाचे अनावरण करण्यात येईल. त्यावेळी हातात दिवे लावून भारत देशाला सन 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेईन अशी सर्वांना पंचप्राण शपथ देण्यात येईल.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, सेवानिवृत्त पोलीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अहिल्यादेवी पुरस्कार प्राप्त महिलांचा सत्कार याप्रसंगी करण्यात येणार आहे. जोगेश्वरी माता मंदिर परिसरात वृक्षारोपण तसेच दोन मुठी माती जमा करून कलशात साठवून तो कलश पंचायत समिती रोहा यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा वर्धापन दिन व 76 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन नागोठणे ग्रामपंचायतीने केले आहे. दरम्यान ग्रामपंचायत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाल्याने यावर्षीचे ध्वजारोहण प्रशासकांच्या हस्ते होणार आहे.