विश्वास निकम
गोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील खांब ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेली तीन चार वर्षापूर्वी नव्याने उभारलेली भाजी मंडई इमारत झाडी गवताच्या विळख्यात सापडली असुन ती अखेरची घटका मोजत आहे की काय अशा अवस्थेत आहे. त्यामुळे आता खांब ग्रामपंचायतीचा विकासकामांबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या खांब नाक्यावरील बाजारपेठेची ओळख ही ब्रिटिश राजवटीपासून असल्याचे नेहमी ज्येष्ठांकडून बोलले जाते. सदैव रहदारीने गजबजलेल्या या मार्गावरील ठिकाण म्हणजे खांब आणि वरसगाव नाका. असे असले तरी हि ठिकाणे कायम विकासकामे आणि सुशोभीकणापासून वंचित आहेत हे सत्य नाकारता येत नाही. केलेल्या विकासकामांबाबत देखील चांगलीच बोंब सुरू असून विकासाच्या मुद्यावर स्थानिक पुढाऱ्यांची चर्चा नेहमीच असते. केलेली विकासकामे टिकतात की नाही? यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खांब बाजारपेठेत जवळपास पंचवीस ते तीस गावातील ग्राहक खरेदीकरिता येत असतो. त्यासाठी बाजारपेठेत एकाच ठिकाणी ग्राहकांना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी ग्रामपंचायत हद्दीत तसेच खांब नाक्यावर विविध योजने अंतर्गत भाजी मंडई इमारत उभारण्यात आली. बहुचर्चेत असलेल्या खांब ग्रामपंचायतीची मोठी उलाढाल असल्याने तसेच स्थानिक नेत्यांचेही कृपाशीर्वाद असल्याने विकासकामांची खैरात होत असते मात्र केलेली विकासकामे ही किती काळ तग धरतात हा मोठा संशोधनाचा भाग आहे. मागील तीन, चार वर्षापूर्वी येथील ग्रामपंचायत हद्दीत विवीध विकासकामांसाठी ग्रामसेवक क्वाटर्स पाडून दुसऱ्या ठिकाणी असलेले भाजी मार्केट त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आले. तदनंतर करोनाची लाट सुरु झाली. इमारत झाली मात्र त्यात भाजीमार्केट सुरूच झाले नसल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये शासनाचे खर्च करून बांधण्यात आलेले भाजीमार्केट गवताच्या व झाडांच्या विळख्यात सापडले आहे. भाजी मार्केटची इमारत अखेरच्या घटका मोजते की काय? अशा अवस्थेत दिसत आहे.