उरण | अनंत नारंगीकर
उरण नगर परिषदेमार्फत कोट्यवधी रूपयांची संपत्ती कमावत उन्माद माजविणाऱ्यांना यंदाच्या निवडणुकीत पराभूत करून ही ‘भ्रष्ट राक्षसी राजवट’ संपवण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी व्यक्त केला आहे. मोरा गावात झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेला शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना भावना घाणेकर यांनी उरण नगर परिषदेतील भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली. शहरातील स्वच्छतेच्या दुर्दशेचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, “गेल्या वीस वर्षांपासून उरणकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. ही भ्रष्ट राजवट उलथून टाकण्यासाठी जनता सज्ज आहे. जनतेच्या मताने भाजपचा भ्रष्ट कारभार संपुष्टात आणणारच,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार गट) युवा नेते फवाद खान, शिवसेनेचे गणेश शिंदे, शेकापचे रवी घरत तसेच आघाडीचे नगरसेवक उमेदवार यांनीही मनोगत व्यक्त केले. या जाहीर सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
