उरण । अनंत नारंगीकर
उरण तालुक्यातील खोपटा,आवरे, पिरकोण,गोठवणे, चाणजे,वशेणी, पुनाडे, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर शेत जमीनीत समुद्राचे खारे पाणी शिरत आहे. त्यामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण येथील अधिकाऱ्यांनी बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी शेतकरी करत आहे.
उरण परिसरातील पुर्व विभागातील व चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच उपजिविकेच साधन भात शेती आहे. परंतु, गेली अनेक वर्षे खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे न केल्याने समुद्रातील खारे पाणी भात शेतीत शिरत आहे. त्यात जेएनपीए व करंजा बंदरात या अगोदर करण्यात आलेल्या दगड मातीच्या भरामुळे समुद्रातील उधाणाचे पाणी हे सातत्याने भात शेतीत शिरत आहे.एकंदरीत शेतकऱ्यांच उपजिविकेच साधन धोक्यात येत असताना, शासन पुन्हा एकदा चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील १०० एकर जागेवर भराव टाकून मल्टिमाँडेल लाँजिस्टीक पार्क उभारण्याच्या तयारीत असून एमआयडीसी आणि मेरिटाईम बोर्डाने त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे चाणजे, खोपटा, गोवठणे, वशेणी, पुनाडे, आवरे, पिरकोण, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील उरल्यासुरल्या भात शेतीत उधाणाचे पाणी शिरुन खारफुटीचे जंगल वाढण्याचा तसेच भातशेती नापीक होण्याचा संभव आहे. तरी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण येथील अधिकाऱ्यांनी पाहणी करून बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी शेतकरी करत आहे.
खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण येथील विजय पाटील कार्यकारी अभियंता यांच्या कडे उरण तालुक्यातील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु निधी उपलब्ध होऊ न शकल्याने सदरची कामे रेंगाळत पडली आहेत.तरी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी आहे.
-सत्यवान भगत, अध्यक्ष उरण तालुका मनसे
उरण तालुक्यात काही अंशी बांध दुरुस्तीची कामे सुरू आहेत.तसेच खोपटा परिसरातील खाडीकिनाऱ्या वरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासन स्तरावर सतत प्रयत्न केले जात आहेत.लवकरच लवकर सदरची कामे मार्गी लागतील.
-खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण
