पेण | विनायक पाटील
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे नोंदवण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कांदळे येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले आहे. महादेव सीताराम धुमाळ (वय ३४) असे या लोकसेवकाचे नाव असून, त्याच्यावर रायगड-अलिबाग एसीबीने ही कारवाई केली आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे मौजे कांदळे येथील सर्व्हे नं. ८९ या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी आरोपी महादेव धुमाळ याने ५ हजार रुपयांची मागणी केली होती. ही लाच त्याने स्वतःसाठी आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी मागितल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तक्रारदाराने २२ डिसेंबर २०२५ रोजी अलिबाग एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
पडताळणीत गुन्हा निष्पन्न
एसीबीने पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत केलेल्या पडताळणी दरम्यान २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०६ ते ६:२३ या दरम्यान आरोपीने फोनवरून लाचेचा आग्रह धरला. त्याच दिवशी सायंकाळी ७:०३ ते ७:४२ च्या सुमारास उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयाबाहेर झालेल्या प्रत्यक्ष भेटीत ५ हजार रुपये स्वीकारण्यास त्याने संमती दर्शवल्याची बाब समोर आली. या पुराव्यांच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुमाळ विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस उप अधीक्षक सरिता आय. एस. भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, उपनिरीक्षक विनोद जाधव आणि अंमलदार महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील व सागर पाटील यांचा समावेश होता.
कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ ‘अॅन्टी करप्शन ब्युरो’शी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
