• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भारत स्वतंत्र झाला तरी खारेपाट विभाग पारतंत्र्यातच; समीर म्हात्रे कडाडले

ByEditor

Jan 27, 2026

पाणी प्रश्नावरून विरोधकांवर तोफ: ‘प्रजासत्ताक दिनी’ खारेपाटच्या व्यथांना वाचा

पेण । विनायक पाटील
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली असली तरी, पेण तालुक्यातील खारेपाट विभाग आजही पाणी प्रश्नाच्या बेड्यांमध्ये अडकलेला आहे. खारेपाटचा पाणी प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांनी त्याचा केवळ राजकीय वापर केला, अशी घणाघाती टीका वडखळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार समीर म्हात्रे यांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

राजकीय आश्वासनांचा पाऊस, घसा मात्र कोरडाच!

खारेपाट विभागातील पाणी प्रश्नावर बोलताना समीर म्हात्रे म्हणाले की, “निवडणूक जवळ आली की विरोधक आचारसंहितेचे गाजर दाखवतात. आचारसंहिता संपली की पाणी प्रश्न सुटेल, असे आश्वासन देऊन मतांचे राजकारण केले जाते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती आजही ‘जैसे थे’ आहे. उलट हा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होत चालला आहे. त्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला असला, तरी आमचा खारेपाट भाग पाणी प्रश्नामुळे आजही पारतंत्र्यातच असल्यासारखे वाटते.”

प्रलंबित प्रश्नांची जंत्री

केवळ पाणीच नव्हे, तर खारेपाटच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. त्यांनी खालील मुद्द्यांकडे लक्ष वेधले:

खरबंदिस्तीचा प्रश्न: शेती वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या खरबंदिस्तीचे काम रखडलेले आहे.

पायाभूत सुविधा: रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचा अभाव.

बेरोजगारी: स्थानिक तरुणांच्या हाताला काम नसून रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे.

शेतकरी संकट: नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजा संकटात आहे.

बदलाचा दृढनिश्चय

प्रचारफेरी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना म्हात्रे यांनी दावा केला की, अनेक वर्षांच्या या अन्यायामुळे आता खारेपाटमधील जनतेचा संयम सुटला आहे. “या भागातील वंचित नागरिकांनी आता बदल करण्याचा दृढनिश्चय केला आहे. यंदाचा निकाल हा खारेपाटला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करणारा असेल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!