• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अजितदादांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा; श्रीवर्धनमध्ये कडकडीत बंद

ByEditor

Jan 29, 2026

लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने ठेवली बंद

श्रीवर्धन : अनिकेत मोहित
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एक कणखर लोकनेता आणि ‘कामाचा माणूस’ अशी जनमानसात ओळख निर्माण केलेल्या अजितदादांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, श्रीवर्धन शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला.

व्यापाऱ्यांकडून स्वयंस्फूर्त प्रतिसाद

अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच श्रीवर्धनमधील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपापली दुकाने व आस्थापने तातडीने बंद केली. सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. कोणत्याही राजकीय आवाहनाशिवाय व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.

कर्तृत्ववान नेतृत्वाचा अस्त

अजितदादा पवार हे त्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनासाठी आणि झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात. “शब्दाला पक्का आणि कामात गती” ही त्यांची कार्यशैली प्रशासनावरही छाप पाडून होती. त्यांच्या जाण्याने राज्याने एक खंबीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना श्रीवर्धनमधील नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील विविध चौकांत अजितदादांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले असून नागरिकांच्या चेहऱ्यावर शोकभाव स्पष्टपणे जाणवत होता.

सामाजिक व व्यापारी संघटनांतर्फे श्रद्धांजली

शहरातील विविध सामाजिक संघटना आणि व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. “अजितदादांच्या कामाचा झपाटा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण कायम स्मरणात राहील,” अशा शब्दांत यावेळी भावना व्यक्त करण्यात आल्या. केवळ बाजारपेठाच नव्हे, तर वाहतूक सेवांवरही या घटनेचा परिणाम दिसून आला असून संपूर्ण शहर स्तब्ध झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!