घनश्याम कडू
उरण : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्कलावल्याने याचा मोठा फटका कांदा निर्यातदारांना (Onion Export) बसला आहे. विदेशात निर्यात होणाऱ्या कांद्याचे 130 ते 140 कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्ट (जेएनपीटी) बंदरात अडकून पडले आहेत.
अचानक निर्यात शुल्क लावल्याने विदेशात जाणाऱ्या कांद्याची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे विदेशातील व्यापार्यांनी कांदा घेण्यास नकार दिल्याने निर्यातीसाठी आलेला कांदा जेएनपीटी बंदरात पडून आहे. जेएनपीटी बंदराप्रमाणे नाशिकमध्ये सुद्धा निर्यातीचा कांदा खोळंबला आहे. पुढील दोन दिवसांत यावर निर्णय न झाल्यास कंटेनर मधील कांदा सडून व्यापारी, शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान होणार आहे. भारतातून आशियायी देशात महिन्याला साधारण 2500 हजार कंटेनरची निर्यात होत असते. मात्र आता केंद्र सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे कांदा निर्यातीला मोठा फटका बसणार असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.