विश्वास निकम
गोवे-कोलाड : कोलाड परिसरातील शेतकरी वर्ग पीएम किसान योजनेपासून वंचित असल्यामुळे दररोज फेऱ्या मारुनही शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा न झाल्यामुळे येथील शेतकरी तलाठी कार्यालयात फेऱ्या मारून त्रस्त झाला आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी भरलेल्या फार्मवर शेतकऱ्याचे नाव, आधारकार्ड नंबर, बँक खाते नंबर अचूक असले तरच याचा लाभ घेता येतो. याची pmkisan.in या वेबसाईटवर सीएससी सेंटरमध्ये जाऊन केवाईसी केली तरच या योजनेचा लाभ घेता येते. परंतु ग्रामीण भागातील शेतकरी अशिक्षित असल्यामुळे याची त्यांना माहिती नसल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत.
या योजने अंतर्गत शेतकरी वर्गाला वर्षातून ६ हजार रुपये केंद्राकडून व राज्य शासनाकडून चार महिन्यांनी तीन हप्त्यात जमा होतात परंतु, कोलाड परिसरातील असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यात चार हप्ते जमा झाले नाही. याचे कारण वेगळेच आहे. या पीएम किसान यादीत वरसगांव येथील गावाचे नाव वासगाव असे झाल्यामुळे येथील बलराज कुर्ले, विजय शिंदे, रोहिदास शिंदे, सुभाष मालुसरे, राजीवले, सानप, या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे चार हप्ते जमा झाले नाहीत. याला जबादार कोण? येथील शेतकरी फेऱ्या मारून मेटाकुटीला आले असुन शासनाच्या चुकीमुळे याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. यामुळे फक्त सुशिक्षित शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.