महाड । मिलिंद माने
महाड-रायगड मार्गावरील वरणडोली गावालगत कार आणि मोटारसायकल दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका २८ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी घडला. राजेश बापू जाधव (वय २८) असे या अपघातात प्राण गमावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी राजेश जाधव हा आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH-06-CN-1170) वरणडोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करत होता. याच दरम्यान समोरून येणाऱ्या कारने (क्रमांक MH-06-CL-2588) दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार राजेश जाधव गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताच्या वेळी जयसिंग यादव हा कार चालवत होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
