रायगड : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ १८०० फूट खोल दरीत कोसळून साताऱ्यातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे सर्वजण साताऱ्यातून महाबळेश्वरला फिरायला गेले होते; मात्र रविवारी रात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ १८०० फूट खोल दरीत कोसळली आणि यात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटात रविवारी रात्री घडलेल्या या भीषण अपघातात स्कॉर्पिओ गाडी तब्बल १८०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त सर्वजण आसगाव (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत २ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, स्कॉर्पिओ आणि इतर अपघातग्रस्तांचा शोध घेतला जात आहे.
अपघातग्रस्त स्कॉर्पिओचा क्रमांक MH 11 DN 2340 असा आहे. मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), अंश समीर चव्हाण (वय १८), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५) आणि नितीन किसन नायकोंडे (वय ३५) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, रात्री १० वाजल्यापासून ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ तसेच ‘प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम’कडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
