श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील विठ्ठल आळी परिसरात आज एक भीषण कार अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन थेट पलटी झाली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने चालकासह प्रवासी सुखरूप असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा वेग अधिक असल्याने वळणावर चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. कार पलटी होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि कारमधील प्रवाशांना बाहेर काढत मदतकार्य केले. नागरिकांच्या तत्परतेमुळे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

या अपघातानंतर विठ्ठल आळी परिसरातील रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर परिसरातील रस्ता अत्यंत अरुंद असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या गटाराला कोणतीही संरक्षण भिंत किंवा कठडा बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघाताची टांगती तलवार असते, अशी तीव्र नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी तातडीने संरक्षण भिंत किंवा रेलिंग बसवावे, अशी आग्रही मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
