उरण | विठ्ठल ममताबादे
सध्याच्या व्यावसायिक युगात मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध केवळ करारापुरते मर्यादित होत असताना, उरणमध्ये माणुसकीचे जतन करणारी एक अनोखी आणि कौतुकास्पद घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपले वाहनचालक मेहबूब लदाप यांना सव्वा कोटी रुपये किमतीचा, सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज असलेला ‘मयुरेश व्हिला’ हा बंगला अधिकृतपणे नावावर करून दिला आहे. द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या बंगल्याचे उद्घाटन सोनाली रिअॅलिटीचे डायरेक्टर मयुरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले असून, तो चालक लदाप यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक क्षणी महेंद्रशेठ घरत, त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत, कुणाल घरत आणि एम. जी. ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाच वर्षांच्या प्रामाणिक सेवेचे फळ
चालक मेहबूब लदाप अवघ्या पाच वर्षांपासून महेंद्रशेठ यांच्याकडे कार्यरत आहेत. २८ एप्रिल २०२१ रोजी गव्हाण येथील शांतादेवी यात्रेच्या दिवशी ते कामाच्या शोधात महेंद्रशेठ यांच्या ‘सुखकर्ता’ निवासस्थानी गेले होते. तेथे त्यांना चालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या अनपेक्षित आणि अफाट भेटीमुळे भारावून गेलेल्या मेहबूब लदाप यांनी सांगितले की, “तो दिवस माझे संपूर्ण जीवन बदलणारा ठरला. आपण केवळ साहेबांची गाडी चालवत होतो, पण ते आपल्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत आहेत. जात, धर्म किंवा प्रांत असा कोणताही संकुचित विचार न करता त्यांनी माझ्यासारख्या सामान्य तरुणाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे.”
कृतीतून जपली सामाजिक आणि कौटुंबिक मूल्ये
महेंद्रशेठ घरत यांनी घेतलेला हा निर्णय केवळ श्रमाचा गौरव करणारा नसून संपत्तीचा वापर सामाजिक न्यायासाठी कसा करावा, याचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे. स्वतःला एकच मुलगा असून त्याला राहण्यासाठी एक बंगला पुरेसा आहे, या उदात्त विचाराने त्यांनी दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. शेलघर येथील त्यांचा ‘सुखकर्ता’ बंगला गरजू लोकांसाठी नेहमीच हक्काचे ठिकाण राहिला असून, तिथून कोणताही गरजू माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही, हा जनमानसातील विश्वास या घटनेमुळे अधिक दृढ झाला आहे.
महेंद्रशेठ यांच्या दातृत्वाचे पैलू केवळ याच घटनेपुरते मर्यादित नाहीत:
- १५०० कुटुंबांना हक्काचे घर: आतापर्यंत सुमारे १५०० लोकांना हक्काच्या घरांसाठी लागणारे साहित्य किंवा थेट आर्थिक मदत त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
- अनाथ व गरीब मुलांचे पालकत्व: अनेक अनाथ आणि गरीब मुले दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक फी आणि इतर आवश्यक गरजांचा खर्च ते स्वतः उचलतात.
- शिक्षणाची दारे खुली: गव्हाण येथे आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना करून सर्वसामान्यांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुलभ केले.
- महागड्या भेटी: गरजू व सहकाऱ्यांना आजवर त्यांनी अनेक चारचाकी गाड्या आणि महागडे मोबाईल फोन देखील भेट दिले आहेत.
लिंगसमानतेचा आदर्श वस्तुपाठ
समाजात मुलगा-मुलगी समानतेच्या केवळ गप्पा मारल्या जात असताना, महेंद्रशेठ यांनी आपल्या स्वतःच्या कमाईचे चार हिस्से करून मुलगी, मुलगा आणि पत्नी शुंभांगीताईंना समान वाटा दिला आहे. नवी मुंबई परिसरात साडेबारा टक्के जमिनींच्या वाटणीवरून कौटुंबिक वाद आणि नाती तुटत असल्याचे पाहून त्यांनी हा कौटुंबिक शांततेचा निर्णय घेतला. तसेच, सर्व वडिलोपार्जित संपत्तीही भाऊ-बहिणींना व्यवस्थित वाटप करून त्यांनी आपल्या आईच्या नावाने ‘यमुना सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्ट’ स्थापन केला आहे.
संपत्तीपेक्षा कौटुंबिक शांतता, सामाजिक न्याय आणि नैतिक मूल्ये किती श्रेष्ठ असतात, याचा एक नवा पायंडा महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कार्यातून घालून दिला आहे. या कौतुकास्पद निर्णयाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
