वैभव कळस
म्हसळा : नव्याने विकसित होत असलेल्या दिघी पुणे राष्ट्रीय ७५३एफ मार्गावर अपघात प्रवण क्षेत्रात असलेल्या त्रुटी आणि नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या पर्यायी मार्गावर आवश्यक सुधारणा करण्यासाठी म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी शासनाच्या अधिकारी वर्गाचे आडमुठे धोरण आणि दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार सुनील तटकरे यांना लेखी निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. निवेदनात त्यांनी दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील म्हसळा तालुक्यातील अनेक आवश्यक त्या सुधारणांची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
मुंबई माणगाव दिघी राज्य मार्गाचे नव्याने दिघी पोर्ट विकसित झाले नंतर ते आता दिघी पुणे राष्ट्रीय मार्ग तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे जवळ जवळ ९० टक्के काम पुर्ण झाले आहे. रस्ता बांधकामासाठी ५०० कोटीहून अधिक निधी केंद्रिय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुर करुन राष्ट्रीय विकासाला मोठ्या प्रमाणात गती दिली आहे. असे असताना दिघी पुणे राष्ट्रीय मार्गाचा विकसित झालेला दर्जा पहाता तो अवजड वाहतुकीला खुपच घातक आहे. या मार्गावरील माणगाव, म्हसळा तालुक्यातील डोंगर कपारातील वेडी वाकडी वळणे आणि तीव्र चढउतार पहाता रस्त्याचे रुंदीकरण व बांधकाम ज्या दर्जाचे होणे गरजेचे होते तसे करण्यात आलेले नाही. जास्तीत जास्त धोकमपट्टी करून जुन्या मार्गात असलेल्या वेड्या वाकड्या वळणाचेच नूतनीकरण करण्यात आले आहे. तसे केल्याने दिघी- म्हसळा-माणगाव रस्त्यावर पुर्वी जे मोर्बाघाट, घोणसे घाट अपघात प्रवण क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आजही सर्रास अपघात होत आहेत. रस्ता नूतनीकरण झाले नंतर अनेक निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. कित्येक जण जायबंदी तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याची शासन दरबारी नोंद आहे. दिघी पुणे
राष्ट्रीय मार्ग हा शासनाच्या एमएसआरडीसीचे अखत्यारीत आहे. संबंधित खात्याचे अधिकारी तसेच रस्ता विकासक यांना खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे यांनी स्वतंत्र बैठका घेऊन व वेळोवेळी पाठपुरावा करून अपघात प्रवण क्षेत्रात आणि घातक चढउतार वळणावर रस्त्याची सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच स्वतः अधिकारी वर्गासोबत रस्त्याची पाहाणी करून तसे निर्देश देण्यात आले होते. संबंधित अधिकारी वर्गाने घोणसे घाटात लोकप्रतिनिधी व नागरीक यांचे समावेत पहाणी करून संरक्षण भिंत, अपघात सुचना फलक आणि गतिरोधक बसविण्या पलीकडे विशेष काही सुधारणा केल्या नसल्याने अपघात प्रवण क्षेत्रातील अपघात थांबण्याच्या घटना काही थांबत नाहीत. याउलट प्रवासी वर्गात अपघाताची भीती वाढली आहे.
माजी सभापती महादेव पाटील यांनी मंत्री महोदय व खासदार यांना दिलेल्या निवेदनात घाटातील कर्व्ह (वळण) कमी करून अपघात प्रवण क्षेत्रातील रस्ता नव्याने विकसित करणे, म्हसळा शहर पर्यायी मार्गावर गवळवाडी लगत असलेले धोकादायक रस्त्याला संरक्षण भिंत बांधून देणे, गाव जोडरस्त्यांचे चौकात वाहतूक नियमावलीप्रमाणे सुधारणा करून मिळाव्यात, म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल येथे प्रवासी वर्गाची गैरसोय होत असल्याने बसस्थानक तयार करून द्यावा. सकलप खारगावखुर्द जोड रस्त्यांचे रुंदीकरण रस्त्याला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोरी व गटार तयार करून मिळावे, शाळा कॉलेज आसलेल्या ठिकाणी संरक्षण कामी रस्त्याचे बाजुला सुधारणा करून मिळाव्यात अशी अनेक मागण्याचे निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.