नंदकुमार मरवडे
खांब : रोहे तालुक्यातील दुर्गम भागातील गारभट खिंडीतील उतारावरील झाडे प्रवास व वाहतूकीच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहेत.
मुसळधार पावसामुळे डोंगर उताराची झीज होऊन या खिंडीतील जेमतेम मातीचा आधार असलेली काही झाडेही कोसळली आहेत. तर सध्या काही झाडे ही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने खिंडीतील उतारावर काही झाडे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता सदरील धोकादायक झाडे तोडण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.
विठ्ठलवाडी-गारभटचा परिसर जरी तालुक्यातील दुर्गम भागातील असला तरी या परिसरातील गावांची संख्याही फार मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच रहदारी आढळून येते. तसेच हा परिसर दुर्गम, डोंगराळ व निसर्गरम्य परिसरात असल्याने व या भागात असणारे विविध फार्म हाऊस तसेच सुप्रसिद्ध असणारा ऐनवहाळ येथील धबधबा व डोलवहाल बंधारा यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. तसेच गेल्या वर्षापासून रोहा ते विठ्ठलवाडी लाल परीही धावू लागल्याने संबंधितांनी लवकरच या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.