एकजण गंभीर जखमी, सर्वत्र धुराचे लोट
शशिकांत मोरे
धाटाव : धाटाव एमआयडीसीतील रोहा डायकेम कंपनीतील कोळसा व कच्चा माल साठा गोदामाला बुधवारी दुपारी भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. आगीच्या भडक्याने एका मागोमाग एक रसायनमिश्रित ड्रम उडाले. त्यातून स्फोटांचे भयंकर आवाज आले. संपूर्णतः एमआयडीसीत सर्वत्र धुराचे लोट अनेक तास दिसून आल्याने एकच हाहाकार उडाला. भीषण आगीची घटना लक्षात घेताच कंपनीतील कामगारांना सुरक्षित स्थळी तातडीने बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या भयानक घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात आल्याची माहिती उशिरा कंपनी प्रशासनाने दिली. दरम्यान, हा कोळसा व कच्चा माल साठा गोदाम होता. त्याला कशाने आग लागली, याबाबत अजून स्पष्टता नाही. यात कंपनीचेही करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे तर लागलेल्या आगीत जीवितहानी टाळण्यात प्रशासनाला यश आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
रोहा डायकेम कंपनीत बुधवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. एकापाठोपाठ स्फोट झाले. अचानक लागलेल्या आगीचे भयंकर स्वरूप समोर आले. धुराच्या लोटाने संपूर्ण एमआयडीसी अक्षरशः झाकोळून गेली. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी एमआयडीसी, रिलायन्स, सुप्रीम कंपनीचे अग्निशमन दल सज्ज राहून उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार किशोर देशमुख, पो. निरीक्षक प्रमोद बाबर, आरआयएचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर यांसह ग्रामस्थांनी तातडीने कंपनीतील कामगारांना बाहेर सुरक्षित काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे समोर आले. याच झटापटीत एक कामगार जखमी झाल्याने त्याला उपचार्थ मुंबई येथे हलवण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले तर सर्वच कंपनीच्या सुरक्षा दलाच्या जवानांनीही कौतुकास्पद कामगिरी करत परिस्थिती आटोक्यात आणली. गोदामात कच्चा माल व कोळसा असल्याचे सांगण्यात आले. आगीत पूर्णतः गोदाम भस्मसात झाल्याने कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. तरीही आगीत जीवितहानी न झाल्याने कंपनी प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
धाटाव एमआयडीसीतील कंपन्यांत आगीच्या व अपघाताच्या घटना नव्या नाहीत. कंपन्यातील अपघातात अनेक कामगार आतापर्यंत मृत्युमुखी पडले. त्यात एक्सेल, युनिकेम कंपनी कायम आघाडीवर राहिली. तर अँथिया कंपनीला लागलेल्या भीषण आगीनंतर ही दुसरी आगीची सर्वात मोठी घटना अधोरेखित झाली आहे. आगीची भीषणता इतकी होती की आगीचे धूर रोहा व सर्वत्र ग्रामीण भागातून स्पष्ट दिसत होते. अग्निशमन दल व प्रशासनाच्या सतर्कतेने भीषण आग आटोक्यात आली. सर्वच कंपन्यांचे सुरक्षा दल, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करीत घटना हाताळली, त्यामुळे आगीवर नियंत्रण व कामगार सुरक्षेत यश मिळवता आले. गोदामाला आग नेमकी कशाने लागली? हे लवकरच समोर येणार आहे. दरम्यान, एमआयडीसीत वारंवार घडणाऱ्या व अपघातांच्या घटनांनी कामगारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तर वारंवार घडणाऱ्या घटनेतून कंपनी प्रशासन, कारखाना निरीक्षक विभाग, एमपीसीबी प्रशासन बोध का घेत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.