• Sun. Feb 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा तालुक्यातील मेंदडी बौद्धवाडी तहानलेली!

ByEditor

Sep 15, 2023

• पाण्यावाचून कसं राहायचं? महिलांची सवाल; जलसंधारणाची गरज
• गेली पाच वर्षे मुबलक पाण्याची मागणी; सातत्याने मोटार बिघाड तर मनुष्यबळ कमतरतेमुळे पाण्यासाठी वणवण

गणेश प्रभाळे
दिघी :
जोरदार पावसाची हजेरी होऊन, अद्याप पावसाळा संपला नाही. मात्र, म्हसळा तालुक्यातील मेंदडी बौद्धवाडीला यंदाही शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. याशिवाय येथील रुग्णालयात देखील पाणी समस्यांची झळ बसत आहे

दिघी–पुणे महामार्गावर मेंदडी हे गाव आहे. एकीकडे झपाट्याने म्हसळा परिसरातील सुविधायुक्त शहरांची होत असलेली उभारणी बहुचर्चित आहे. या ठिकाणापासून म्हसळा-दिघी मार्गावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मेंदडी बौद्धवाडीवर साधारण ३० कुटुंबातील जवळपास ८५ लोक राहातात. पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी बौद्धवाडीला अद्यापही पाणीटंचाई सोसावी लागत आहे. परिणामी, येथील नागरिक पाण्यासाठी मैलो – मैलोभर वणवण फिरत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत फारसे कोणीही लक्ष दिले नाही. दरम्यान, सरकारने येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वतंत्र पाणी योजना राबवली. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सुविधा पोहचत नसल्याने नागरीकातून आजही संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात दूरदृष्टी ठेऊन विविध विकास कामे करण्यात आली. तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या. मात्र, मेंदडी गावाला पाणीपुरवठयासाठी धरण असून या धरणाचे पाणी बौध्दवाडीला मिळत नाही. वेळोवेळी पाणी योजनेची मागणी होऊन सुद्धा येथील नागरिक पाण्यापासून तहानलेले आहेत.

‘हर घर जल’ आलेच नाही
येथे भारत निर्माण कार्यक्रम अंतर्गत २००७ मध्ये २ लक्ष निधीतून पाणी योजना राबवण्यात आली. तर दुसऱ्यांदा २०१६ मध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून ‘स्वजल धारा’ या पाणी योजनेसाठी १० लक्ष निधी वापरण्यात आले. मात्र, दोन्ही योजनेतून घराघरात पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थ रानातील झऱ्यातून पाणी आणून पितात. अशाने येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी दूर करणे प्रशासनाला आव्हानात्मक असून प्रशासनाच्या तत्परतेचा अभाव अशा क्षुल्लक कारणांमुळे मेंदडी बौद्धवाडीवरील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे.

रुग्णालयाला झळ
बौद्धवाडी हद्दीत पशू वैद्यकीय व प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन्ही रुग्णालयात पाण्याची समस्या आहे.

जलसंधारणाची गरज
शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), कृषी विभागाच्या योजना राबविल्या जातात. मात्र, अशा योजनाचा फारसा फरक तालुक्यातील गावांना पडला नाही. तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात जल संधारण तसेच जल संवर्धन सारख्या कायम व दूरदृष्टी उपायांची गरज आहे. मेंदडी गावा जवळच औद्योगिककरण होत असून, येथील नागरिकांना पाण्या सारख्या सुविधा मिळू शकत नाही.

अशुद्ध पाणीपुरवठा
बौद्धवाडी परिसरात पाणी साठवणुकसाठी टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीला दहा – बारा वर्ष उलटून गेली. मात्र, एकदाही साफसफाई करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वाडीवर पिण्यासाठी पाणी नाही. या समस्येमुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. गेली कित्येक वर्ष पाणी मिळण्यासाठी पत्र व्यवहार करत आहोत. मात्र, अद्याप लक्ष दिलेच नाही.

-अरुण जाधव,
रहिवासी बौद्धवाडी मेंदडी

मेंदडी बौद्धवाडीवर पाण्याची सुविधा मिळण्यासाठी मोटार बसविण्यात आली असून, दोन दिवसापूर्वी मोटारीत बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे.

-राजश्री कांबळे,
मेंदडी सरपंच

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!