• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा, तळा तालुक्यात करण्यात आलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे!

ByEditor

Jun 9, 2023

• शासनाचा लाखो रुपयांचा निधी पावसाचे पाण्यात वाहुन जाण्याची भीती!
• ठेकेदारांना कामाचे बिल अदा न करण्याची नागरिकांची मागणी

वैभव कळस
म्हसळा :
शासनाच्या वेगवेगळ्या योजने अंतर्गत आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांचे निधीतून शहरात व गाव जोड रस्त्यांचे डांबरीकरण रस्त्याचे काम पावसाळा तोंडावर आला असताना मे महिन्याच्या अखेरीस करण्यात येत आहेत. म्हसळा आणि तळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये डांबरीकरण करण्यात आलेले जोड रस्ते हे अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे करण्यात आले असून ते येणाऱ्या पावसाचे पाण्यात वाहुन जाण्याची भिती नागरिकांना वाटत आहे. बांधकाम विभाग अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या संगनमताने शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जाईल की काय? अशी चर्चा नाका नाक्यावर ग्रामस्थ दबक्या आवाजात करताना ऐकायला मिळत आहे. वास्तविक पहाता शासनाच्या नियमानुसार दर वर्षी १५ मे नंतर नव्याने विकसित करण्यात येणारे रस्ते डांबरीकरण करण्याचे काम बंद करण्यात येते मात्र म्हसळा तालुक्यात या नियमाला धाब्यावर बसवून वेगळाच नियम काढण्यात आला आहे.

म्हसळा तालुक्यातील सर्व मंजुर कामे सन २०२२ व २०२३ या आर्थिक वर्षात मंजुर करण्यात आली असताना ती माहे मे अखेरीस पुर्ण करण्याचे कारण काय? मंजुर विकास कामे लवकर व दर्जेदार करण्यासाठी संबंधित ग्रामस्थ व पक्षांचे पदाधिकारी मंडळी लोकप्रतीनिधींकडे सातत्याने विनंती करीत असतात असे असताना बांधकाम अधिकारी आणि ठेकेदार शासनाचा निधी उकळण्यासाठी संगनमत करून मंजुर काम घाईगडबडीत पुर्ण झाल्याचा केवळ फार्स करताना दिसत आहेत. शासनाचा लाखो रुपयांचा निधी आपल्याला जास्तीचा नफा मिळविण्यासाठी धावपळ करून यशस्वी प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हसळा तालुक्यात नव्याने माहे मे अखेरीस करण्यात आलेल्या डांबरीकरण रस्त्यावर काळा डांबर फवारून केलेल्या कामांची खडी आता उकरून वाहनाच्या टायरखाली गोट्यांचा खेळ खेळताना निदर्शनास येत आहे. नव्याने विकसित झालेल्या बहुतांश रस्ते बांधकामाचा दर्जा अखेरच्या उन्हाळ्यात असा असेल तर चार महिन्यांचे पावसाळयात तो कसा असेल याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करूनच ठेकेदारांना बांधकामाची बिल अदा करण्यात यावीत अन्यथा योग्य ती कारवाई करून शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जाण्यापासुन वाचवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!