अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या शेमटीखार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सिडको व रेल्वे प्रशासनाने कोणताही न्याय दिला नसल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज (दि. ९) पासून रांजणपाडा रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारा समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार संस्थेच्या उपाध्यक्ष रेश्मा ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या शेमटीखार या महसूल विभागातील जमिनी सिडकोने व रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकासाठी घेतल्या. मात्र, या प्रकल्पात त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना नोकर भरती व इतर रोजगारात प्राधान्य न देता इतरांना सामावून घेतले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. या अन्याया विरुद्ध शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था व धूतुम ग्रामस्थ मंडळाने रेल्वे स्टेशन समोर सोमवारी (दि. ९) आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद ठाकूर, उपाध्यक्षा रेश्मा ठाकूर यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकूर, तालुका सचिव दिनेश पाटील, माजी उपसरपंच शरद ठाकूर यांनी उपस्थित राहून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला.
