विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ साली अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यास जवळ जवळ एक वर्ष उलटून गेले तरीही नुकसानग्रस्त भरपाई पासून वंचित आहेत. अशा अनेक गावातील नुकसानग्रस्तापैकी एक असलेल्या चिरनेर गावातील संतोष नाना म्हात्रे यांच्या घराची भिंत दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी सततच्या अतिवृष्टीमुळे कोसळून पडली होती. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
चिरनेर गावाला पुराच्या पाण्याचा विळखा कित्येक वर्षापासुन बसत आहे. प्रशासनाने याबाबत उपाययोजना केल्या पाहिजेत. दरवर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे या गावाला पुराच्या पाण्याचा फटका बसुन येथील रहिवाशांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असते. चिरनेर येथील रहिवाशी संतोष नाना म्हात्रे यांच्या घराची सततच्या पडणार्या पावसामुळे भिंत कोसळली होती. दरम्यान, अतिवृष्टीमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना आर्थिक संकटाचा सामना आजही करावा लागत असून प्रशासनाकडून पंचनामा करून जवळ जवळ एक वर्ष पूर्ण होण्यास आले, परंतु नुकसान भरपाईपासून अजूनही ते आणि असे अनेक नागरिक वंचित आहेत.
गरीब परिस्थितीमध्ये असलेल्या संतोष म्हात्रे तसेच इतर नागरिक यांना प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.अशी त्यांची आणि चिरनेर येथील नागरिकांची मागणी आहे.