किरण लाड
नागोठणे : रायगड जिल्ह्याला ‘भाताचे कोठार’ संबोधले जाते, कारण येथील बहुतांशी शेतकरी भातशेती करतात. विशेषतः शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने बहुतांश शेती ही पावसाळ्यातील पाण्यावर अवलंबून आहे.
पावसाच्या नक्षत्राची सुरुवात ही जरी रोहिणी नक्षत्रापासुन होत असली तरी, पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा मृग नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्रात सुर्य आला की पावसाळा सुरु होतो. या वर्षी 8 जूनला मृग नक्षत्र सुरु झाले असले तरी जिल्ह्यात म्हणावा तेवढा पाऊस पडलेला नाही. थोडाफार पाऊस पडला आणि शेतकरी वर्गांने पेरणीची कामे उरकून घेतली. परंतु पाऊस पडत नसल्याने शेतात पेरलेले भात बियाणे पाण्याविना करपण्याची भीती निर्माण झाली आहे. पाऊस पडत नसल्याने जमिन पाण्याविना कोरडी आहे. त्यामुळे जमिन नांगरणीची कामे लांबणीवर पडली आहेत. खरीप हंगामातील शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतीची पुरक कामे पावसाविना लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.