अनंत नारंगीकर
उरण : चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील अंडर पास ( भुयारी) रस्त्यावर शुक्रवारी (दि. ३०) रात्री ठिक ८-३०च्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात फोर व्हीलर गाडी व मोटारसायकल चालक थोडक्यात बचावले.
जेएनपीए बंदर प्रशासनाने एनएच ४ बीच्या माध्यमातून जेएनपीए बंदर ते पळस्पे फाटा या महामार्गाची उभारणी केली आहे. या महामार्गावरील चिर्ले व धुतूम गाव परिसरातील नागरिकांना, प्रवासी वाहनांना सुखकर प्रवास होण्यासाठी एनएच ४ बी ने चिर्ले व धुतूम गावाजवळ अंडर पास ( भुयारी) रस्त्याची उभारणी केली आहे. परंतु, सदर अंडरपास (भुयारी) रस्ता हा प्रवाशी वाहतूकीसाठी असताना या रस्त्यावरून रात्री अपरात्री अवजड वाहने प्रवास करत आहेत. त्यामुळे अपघाताची संख्या बळावली आहे.

त्यातच मागील महिन्यात धुतूम गावा जवळील अंडर पास (भुयारी) रस्त्यावर मालवाहू कंटेनर फोर व्हीलर गाडीवर पलटी होण्याची घटना घडली होती. सुदैवानी सदर अपघातात फोर व्हीलर गाडीचे नुकसान झाले आणि चालक थोडक्यात बचावला होता. या अपघातानंतर चिर्ले गावातील श्री राम मंदिर परिसरातील अंडर पास ( भुयारी) रस्त्यावर शुक्रवारी (दि. ३०) रात्री ठिक ८.३० वाजता मालवाहू कंटेनर पलटी होण्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने मोटारसायकल चालक थोडक्यात बचावला आहे.
एनएच ४ बी ने चिर्ले व धुतूम गाव परिसरातील नागरिकांचा, दैनंदिन नोकरदार प्रवासी नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सदर गावाजवळ अंडर पास (भुयारी) मार्ग बनविला आहे. परंतु, रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावरील अंडर पास (भुयारी) रस्त्यावरून रात्री अपरात्री अवजड वाहनांची रेलचेल असते. त्याचा त्रास हा नागरिक, लहान वाहनचालक यांना सहन करावा लागत आहे. तरी नागरिकांच्या रहदारीच्या भुयारी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी नाहीत तर होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांचा जीव जाणार अशी भीती सामाजिक कार्यकर्ते निळकंठ घरत यांनी व्यक्त केली आहे.