• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लाकडांची विना परवाना वाहतूक करताना वनविभागाची कारवाई

ByEditor

Nov 3, 2023

सहा जणांसह ट्रॅक्टर आणि जेसीबी वनविभागाच्या ताब्यात

मिलिंद माने
महाड :
पोलादपूर तालुक्यातील ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर गस्त घालत असताना लाकडांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे. यामध्ये सहा जणांसह ट्रॅक्टर आणि जेसीबी वन विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.

पोलादपूर तालुक्यातील ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर वनक्षेत्रपाल राकेश साहू आणि त्यांचे पथक गस्त घालत असताना दोन ट्रॅक्टरमध्ये आंब्याचे भले मोठे लाकूड आणि साग वाहतूक करताना आढळले. याबाबत चौकशी केली असता वाहतूक करणाऱ्या लोकांकडे कोणत्याच प्रकारचे कागदपत्रे आढळली नाहीत. यामुळे विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरता वनविभागाने ताब्यात घेतले आहे. याबाबत वनाधिकारी राकेश साहू यांनी माहिती देताना पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावाजवळ ही विना परवाना लाकूड वाहतूक आढळून आल्याचे सांगितले. यामध्ये नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर, एक जे.सी.बी., एक स्कूटर, तसेच आंब्याची दोन लाकडे, साग असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये सूर्यकांत सुरेश तांबे (३८ मांडवे), दिनेश रामदास तांबे (वय ४५ कोरेगाव, तालुका – खेड), अनिल धर्मा चव्हाण, (ट्रॅक्टर चालक सुकिवली खेड), संदीप श्रीकांत पाटणे (ट्रॅक्टर चालक मालक ४२ भरणे नाका), रजनिष मनिराम निसाद (२४ अकबरपुर यू. पी., जे सी बी चालक), शेखर यशवंत शिंदे (३२ कोरेगाव खेड), कपिल देव (नीसाद यू. पी. सद्या मुक्काम पोलादपूर जेसीबी हेल्पर), अमेष जयराम तांबट (३० कोरेगाव खेड कामगार), बबन लक्ष्मण तांबे (४० मांडवे) यांचा समावेश आहे.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींविरोधात भारतीय वन कायदा अधिनियम १९२७ कलम ४१, ४२ अन्वये गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी राकेश साहू यांनी दिली. या पथकामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी राकेश साहू, वनपाल संजय चव्हाण, संदीप परदेशी वनरक्षक अतिरिक्त कार्यभार पोलादपूर, वनरक्षक कोतवाल पी. डी. जाधव वनरक्षक यांचा समावेश होता.

महाड वन विभागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षांची तोड होत असल्याने जंगलातील वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा रहिवासी क्षेत्रांकडे वळविला आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीला महाड वनविभागाचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल वनप्रेमी नागरिक वनविभागाला विचारत आहे. मात्र, सुस्त झोपी गेलेले वनखात्याचे अधिकारी याबाबत कोणतेही स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना लगाम कोण घालणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. महाड वन विभागाकडून आजपर्यंत जेवढ्या कारवाई झाल्या त्यावर कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे वारंवार बेकायदेशीर वृक्षतोडीची प्रकरणं उघडकीस येत आहेत. त्याचप्रमाणे बेकायदेशीर खैराच्या वृक्षांची तोड करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या सुमारास पिकअप जीपमधून खैराच्या वृक्षांची वाहतूक महाड, पोलादपूरवरून खेडकडे होत असताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांना मात्र सुतराम कल्पना नसल्याने महाड तालुक्यातील खैराची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!