बहुसंख्य पदाधिकारी व समाज बांधवांनी उपस्थित रहावे -सुरेश मगर
शरद जाधव
रोहा : महाराष्ट्रात सर्वत्र मराठा आरक्षणाचे आंदोलन चालू आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आधीच ओबीसी प्रवर्गात असलेल्या साडेतीनशे पेक्षा जास्त जातींना २७ टक्के आरक्षण दिले गेले आहे. या सत्तावीस टक्के आरक्षणापैकी काही जिल्ह्यात १९ टक्के, काही जिल्ह्यात त्या खालोखाल आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आधीच ओबीसी प्रवर्ग ५२ टक्के पेक्षा जास्त असताना आरक्षण त्यामानाने कमी आहे. असे असताना मराठा समाज जर ओबीसी प्रवर्गात आला तर या आरक्षणात मराठा समाज ओबीसीचे आरक्षण गिळंकृत करेल एवढे निश्चित. या करिता ओबीसी समाज बांधवांनी जागृत रहाणे गरजेचे असल्याचे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
अलिबाग येथे गुरुवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ओबीसी जन मोर्चा संघटनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभेस मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रकांत बावकर – कार्याध्यक्ष ओबीसी जनमोर्चा, अरविंद डाफळे- सरचिटणीस ओबीसी जनमोर्चा, जे. डी. तांडेल – उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा, दशरथ दादा पाटील – ओबीसी नेते, कृष्णा वने – चिटणीस ओबीसी जनमोर्चा, सुरेश मगर – अध्यक्ष रायगड जिल्हा जनमोर्चा व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी जन मोर्चाच्या माध्यमातून जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी गेली कित्येक वर्ष सुरू आहे. ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश अण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांतची बावकर, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, मा. आ. दशरथ पाटील यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु, शासन जातीनिहाय जनगणना करण्यासाठी उत्सुक नाही.
राज्यभर मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे. परंतु, या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी नेते, ओबीसी पदाधिकारी यांना धमक्या देणे, घरावर हल्ले करणे आधी प्रकार चालू आहेत हे थांबवण्याची आवश्यकता आहे. वरील तिन्ही विषयासह अन्य विषय ओबीसी आरक्षण या पार्श्वभूमीवर या संदर्भात जिल्हा स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे .
या बैठकीसाठी ओबीसी अंतर्गत येत असलेल्या सर्व जातींचे रायगड जिल्ह्यातील कोकण अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष यांनी आपल्या कार्यकारणीसह व ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हा कार्यकारणी, तालुका अध्यक्ष यांनी बैठकीसाठी उपस्थित राहून आपल्यावर येऊ घातलेले संकट, आपल्याअधिकारावर घाला घालणाऱ्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, अक्षरा सचिन कदम – जिल्हा महिला अध्यक्ष ओबीसी जन मोर्चा रायगड जिल्हा, अशोक पाटील – जिल्हा सरचिटणीस ओबीसी जन मोर्चा रायगड जिल्हा, निलेश थोरे – जिल्हा युवक अध्यक्ष ओबीसी जन मोर्चा रायगड जिल्हा यांनी केले.
