• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नवगाव ग्रामस्थ चारधाम यात्रेला रवाना

ByEditor

Jun 18, 2023

अलिबाग : मासेमारी बंद झाल्यानंतर देवदर्शनाला जाण्याची अनेक वर्षाची परंपरा नवेदर नवगाव ग्रामस्थांची आहे. मासेमारी बंदी काळात नवेदर नवगावमधून सात बसेस चारधाम यात्रेला रवाना झाल्या आहेत. साधारण ४५ दिवसाच्या कालावधीसाठी एकूण २५० जण यात्रेला गेले आहेत.

नवेदर नवगाव हे मासेमारीसाठी प्रसिध्द असलेले गाव. या गावातील मच्छीमार वर्षभर प्रचंड मेहनत घेतात. त्यानंतर जून महिन्यामध्ये वेगवेगळ्या देवदर्शनासाठी जातात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून गावाने जपली आहे. जून ते जूलै या दोन महिन्याच्या कालावधीसाठी मासेमारीला बंदी आहे. मासेमारीला बंदी असल्याने नवेदर नवगाव येथील महिला ग्रामस्थांनी चारधाम यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. काहीजण 7 जूनपासून या यात्रेसाठी निघाले. तर डीपीज मित्रमंडळ 12 जूनपासून रवाना झाले आहे. सुुरुवातीला अबीर व तुळशीच्या माळा घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर नवेदर नवगाव येथील गौऱ्या पावशे यांच्या घरातून निघाले. मुंबई येथील आकाश घोरपडे यांच्या महालक्ष्मी ट्रॅव्हल्समधील बसमध्ये बसून ही मंडळी निघाली.

15 जूलैपर्यंत हा प्रवास असणार आहे. त्यामध्ये उज्जैन, चित्रकुंट, वाराणसी, बौध्दगया, सितामनी, इलाहाबाद, गोरखपुर, सोनोली, नेपाल, आग्रा, मथुरा, गोकुळ, दिल्ली, हरिद्वार, ऋषीकेश, अमृतसर, कटरा, बद्रीनाथ, गंगोत्री, सोमनाथ, द्वारका, पोर बंदर, वीरपुर, गिरणार त्रंबकेश्वर अशा अनेक धार्मिक स्थळांना व पर्यटन स्थळांचे दर्शन या मित्रमंडळाच्यावतीने घेतले जाणार असल्याची माहिती सचिन पावशे यांनी दिली.

वर्षातून एकदा धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची नवेदर नवगाव गावाची परंपरा आहे. ही परंपरा आजही नवेदर नवगाव जपत आहे. या वर्षी गावातून सुमारे 250 जण चारधाम यात्रेला निघाले आहेत. 30 ते 45 दिवसाचा हा प्रवास असणार आहे.

सचिन पावशे, नवेदर नवगाव

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!