म्हसळा : तालुक्यातील प्रशासकीय व बहुतांश शासकीय कार्यालये असणारी तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक बनली आहे. तब्बल ८८ वर्षांचे आयुष्यमान असलेल्या या इमारतीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तहसीलदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्यापही झाले नाही.
सद्यःस्थितीत सदर इमारतीत व परिसरात तहसील कार्यालय (महसूलचे सर्व विभाग), पोलीस ठाणे, परिक्षेत्र वन अधिकारी, उपकोषागार, सेतू, मंडळ व तलाठी कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयांतून रोजच्या कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने इमारतीचा वापरही वाढला आहे, त्यामुळे इमारत दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी झुलता जिना आहे. तिथे अपंग व महिलांना जाण्यासाठी कसरत करावी लागते. रेलिंगचा पर्याय नाही. पहिल्या मजल्यावर जास्त वर्दळीचे म्हणजे पुरवठा, कुळकायदा, संजय गांधी, निवडणूक, एमआरईजीएस रोजगार हमी योजना, डाटा ऑपरेटर, सुमारे चार ते पाच तलाठ्यांचा कार्यभार असे विशेष गर्दी होणारे महसुली विभाग कार्यरत आहेत. तालुका तेथे महसूल विभागाची स्वतंत्र प्रशासकीय इमारत हा विचार मागील २८ वर्षे महसूलचा मुख्य विषय असून, रस्ते-पाणी-धरणे, राष्ट्रीय महामार्ग, तालुक्याचा विकास आराखडा याविषयी जनतेचे प्रश्न लावून धरणाऱ्या तहसीलदारांनी या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष का केले, असाही प्रश्न जनतेला पडला आहे.
सुरक्षिततेचा भाग म्हणून पहिल्या मजल्यावरील वर्दळीचा भाग आसलेला पुरवठा, कुळकायदा, संजय गांधी, निवडणूक, एमआरईजीएस, रोजगार हमी योजना डाटा ऑपरेटर, सुमारे चार ते पाच तलाठ्यांचा कार्यभार याचा वापर अन्यत्र हलवावा. पोलीस त्यांचे मालकीच्या व शहरातील एसटी स्टँडसमोर व मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जागेत नवीन इमारतीत थाटावे, कार्यालयात असणाऱ्या वन विभागाने स्वतंत्र जागेची मागणी केलेली आहे व जागा उपलब्ध असल्याने त्यांना महसूल विभागाने जागा द्यावी आणि इमारतीच्या फक्त तळमजल्याचा परिपूर्ण वापर करावा, आशाही नागरिकांच्या सूचना आहेत.