घन:श्याम कडू
उरण : उरणमधील रानसई धरणाचा पाणी साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे एमआयडीसीने येत्या दि. १ डिसेंबर पासून उरणमध्ये आठवडयातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली आहे.
तालुक्यातील नागरी वसाहत व औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने (एमआयडीसी) उरणमध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मंगळवार व शुक्रवार आशा दोन दिवसांच्या पाणी कापतीला सुरुवात केली आहे.
उरण तालुक्याचा Sऔद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. त्याचबरोबर लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तसेच इमारती ही मोठया प्रमाणात उभ्या रहात आहेत. मात्र ६० वर्षांपूर्वी उभारलेले धरणाचे, त्यातील गाळ ही काढण्यात आलेला नाही. यामुळे उरणला पाणी पुरवठा करणे दिवसेंदिवस कठीण बनत चालले आहे.
कडक उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे एमआयडीसी हेटवणे धरणातून पाणी घेऊन ही पुरवठा करणे कठीण बनत चालले आहे. त्यामुळे नाईलाजाने पाणी पुरवठामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याची मागणी वाढत असल्याने व आता डिसेंबर महिना उजाडला नसताना ही हालत असेल तर जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करणे कठीण होणार आहे. त्यामुळेच येत्या १ डिसेंबरपासून आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी उरणला पाणी पुरवठा बंद ठेवून कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली आहे.
